Israel Hamas War: इस्राईल- हमास यांच्यातील युद्धात झालेल्या हानीबद्दल भारताला चिंता वाटत असून कोणत्याही परिस्थितीत मानवतावादी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, अशी भूमिका आज भारताने स्पष्ट केली. या युद्धात सामान्य नागरिकांचे हाल होत असल्याबद्दलही भारताने चिंता व्यक्त केली.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी आज पत्रकार परिषद घेत भारत सरकारची भूमिका मांडली. बागची म्हणाले, "इस्राईलवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्व जगाने एकत्र येणे आवश्यक आहे.
या युद्धात प्रचंड हानी झाली असून परिस्थिती कोणतीही असली तरी मानवतावादी कायद्यांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. " गाझा पट्टीत चार, तर वेस्ट बँक प्रदेशात १२ ते १३ भारतीय अडकले असल्याचा अंदाज आहे, असे पत्रकारांनी सांगतानाच बागची यांनी, 'गाझा पट्टीतील स्थिती अत्यंत खराब असून तेथे अडकलेल्या भारतीयांची सुटका करणे सोपे नाही,' असे सांगितले. तसेच, परिस्थिती सुधारल्यास या लोकांची सुटका केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
'ऑपरेशन अजय' अंतर्गत इस्राईलमधून आतापर्यंत १२०० भारतीयांना मायदेशी परत आणले असल्याचे बागची यांनी सांगितले. पॅलेस्टाईनबाबत विचारले असता, 'द्विराष्ट्र हाच तोडगा असल्याची भारताची भूमिका असून त्यासाठी चर्चा केली जावी,' असे त्यांनी स्पष्ट केले. मोदी- अब्बास यांच्यात चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
गाझामधील अल अहली रुग्णालयावरील हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल मोदींनी तीव्र दुःख व्यक्त केले. 'पॅलेस्टिनी नागरिकांना मानवतावादी मदत आम्ही करतच राहू. पश्चिम आशियातील सध्याच्या हिंसेच्या आणि दहशतवादाच्या परिस्थितीबाबत आम्हाला चिंता वाटत आहे. इस्राईल- पॅलेस्टाईनबाबतच्या आमच्या पूर्वीच्याच भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत,' असे मोदींनी अब्बास यांना सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.