

भारतीय सैन्याच्या माऱ्यापुढे पाकिस्तानी सैन्य पूर्णपणे हतबल झाले होते. पाकिस्तानी सैन्याचे मनोधैर्यही खचले होते. भारतीय भूदलाने ढाका वेढले होते. नौदलाने पूर्व पाकिस्तानच्या सर्व बंदरांची नाकेबंदी केली होती. वायुदलाचे अखंड बॉम्बहल्ले सुरू होते. त्यामुळे पाकचा पराभव अटळ होता...
१६ डिसेंबर १९७१, सकाळच्या वेळी ढाक्यातील पाकिस्तानी सैन्याच्या मुख्यालयाकडे पांढरा झेंडा लावलेल्या जीपमधून भारतीय सैन्याचे कॅ. हितेश मेहता आणि कॅ. निर्भय शर्मा सुसाट निघाले होते. त्यांच्याकडे त्यांचे वरिष्ठ अधिकारी जन. नागरा यांनी पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सैन्याचे मुख्यधिकारी जन. नियाझी यांच्यासाठी दिलेला निरोप होता, ‘‘प्रिय अब्दुल्ला, मी इथवर पोचलो आहे. खेळ खतम झालाय. मी सुचवतो की तुम्ही शरण या. मी तुमची काळजी घेईन.’’
नियाझी हादरले. त्यांच्या डोळ्यांसमोर गेल्या २-३ दिवसांचा घटनाक्रम नाचू लागला. १४ तारखेला सकाळी पूर्व पाकिस्तानचे गव्हर्नर अब्दुल मलिक यांच्याबरोबर सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा होती. भारतीय गुप्तहेर खात्याने आमंत्रणाचे सिग्नल बरोबर पकडले. वायुदलाने अर्ध्या तासाच्या आत चार ‘मिग २१’ विमाने पाठवली. गव्हर्नर हाऊसवर ३२ रॉकेटचा मारा झाला. जमलेल्या उच्चपदस्थांपैकी कोणी बळी पडला नाही तरी सगळे हादरले होते.