इस्लामाबाद/लाहोर/कराची : पाकिस्तानात विनाशकारी महापुरामुळे जनजीवन कोलमडून पडले असून तब्बल एक तृतियांश भाग जलमय झाला आहे. पाकिस्तानच्या पुरावर भाष्य करताना हवामान बदल आणि पर्यावरण तज्ज्ञांनी हवामान बदलाचे दुष्परिणाम हे झोप उडविणारे आहे, असे म्हटले आहे. पाकिस्तानात आलेला महापूर ही तर सुरवात असून आगामी काळात हवामानात होणारा बदल हा अधिक धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा ठरू शकतो, असा इशारा दिला आहे.
पाकिस्तानात महापुरामुळे आतापर्यंत ११०० हून अधिक जणांचे बळी गेले आहेत. याशिवाय घरे, पीक, रस्ते यांची अपरिमित हानी झाली आहे. त्याचा फटका ३३ दशलक्ष लोक म्हणजे देशाच्या एक सप्तमांश लोकसंख्येला बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीचे आवाहन केले आहे. अलीकडेच इस्लामाबादेत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी विविध देशांच्या राजदुतांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी पाकिस्तानात कार्बन उत्सर्जन कमी असल्याचे सांगितले. पण हवामान बदलामुळे दुष्परिणाम सहन करणाऱ्यांच्या देशांच्या यादीत पाकिस्तान आठव्या स्थानावर असल्याचे नमूद केले. देशातील आर्थिक नुकसानीचा आढावा घेतला असून ते नुकसान अब्जावधी रुपयांच्या घरात आहे.
पर्यावरणतज्ज्ञांनी केले सावध
कराचीच्या पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सीमा जिलानी म्हणाल्या, की हवामान बदलाचे परिणाम आश्चर्यकारक आहेत. पाकिस्तान आणि जगातील अन्य देशांत जे काही घडत आहे, ते हवामान बदलाचे सर्वात वाईट स्वप्न म्हणावे लागेल. डॉ. जिलानी आणि कराची विद्यापीठाचे सहायक प्रोफेसर डॉ. आमीर आलमगीर यांच्यासह अन्य तज्ज्ञ संरक्षण आणि हवामान बदलावर संशोधन करत आहेत. ते म्हणाले, की यंदाच्या पावसाळ्याचे हे रौद्ररुप पाहून ही तर केवळ सुरवात आहे आणि आगामी काळात तर हवामानात होणारा बदल तर आणखी वाईट असणार आहे. यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल. पाकिस्तानातील कराची शहराचा विचार केल्यास यापूर्वी शहरात कधीही सलगपणे मुसळधार पाऊस आणि पूराने थैमान घातलेले नव्हते आणि ते आपण पाहत आहोत. पाच वर्षापूर्वी कराची शहरात उष्णतेची लाट आली आणि ती जीवघेणी ठरली. कारण त्याचा मुकाबला करण्यासाठी कोणतीच तयारी नव्हती. सुमारे दोन हजार नागरिकांचा या उष्णतेच्या लाटेत मृत्यु झाला होता, अशी आठवण डॉ. आलमगीर यांनी करून दिली. यंदा सुद्धा असेच घडले आहे. अतिवृष्टी आणि महापुरासाठी कोणीही सज्ज नव्हते आणि न भूतो: न भविष्यती असा हाहा:कार माजला.
देशात ठिकठिकाणी पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले. हजारो लोक बेघर झाले आणि आजारी पडले आहेत, असेही ते म्हणाले. गेल्या २५ वर्षांपासून महापुराचा अभ्यास करणारे तज्ज्ञ शाहबाज खान यांनी सध्याचे बदलते वातावरण पाहता पाकिस्तानात आणखी पाऊस पडेल, असे सांगितले. पाकिस्तान सरकारने नागरिकांना पर्यावरण शिक्षण व प्रशिक्षण द्यावे असे आवाहन केले. दरवर्षी केवळ दोन महिने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नागरिकांना नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागते, असेही त्यांनी नमूद केले.
हवामान बदलामुळे विकसनशील देश अगोदरच धोक्याच्या सावटाखाली आले आहेत. त्यातही दक्षिण आशियायी भाग हा अधिक संवेदनशील बनला आहे. पाकिस्तानचे भौगोलिक स्थान अशा भागात आहे की तेथे हवामान बदलाचे दुष्परिणाम अधिक जाणवत आहेत.
डॉ. सीमा जिलानी, पर्यावरणतज्ज्ञ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.