इस्लामाबाद/दोहा (पीटीआय) : काश्मीरसह (kashmir) जगाच्या पाठीवर कोणत्याही भागात रहात असलेल्या मुस्लिमांच्या बाजूने आवाज उठविण्याचा आपल्याला हक्क आहे, असा दावा तालिबानने (taliban) आज केला आहे. तालिबानी राजवटीत अफगाणिस्तानच्या (afghanistan) भूमीचा वापर भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी होण्याची चिंता भारताला सतावत असतानाच तालिबानच्या नव्या पवित्र्यामुळे यात भर पडली आहे. अर्थात, इतर कोणत्याही देशाविरोधात सशस्त्र लढाई करण्याची तालिबानची अद्याप कोणतीही योजना नाही.
तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन याने आज ‘बीबीसी’ला मुलाखत दिली. ‘‘मुस्लिम हे तुमचे नागरिक आहेत आणि त्यांना तुमच्या कायद्याअंतर्गत समान अधिकार मिळायलाच हवेत. यासाठी आम्ही आवाज उठवू. एक मुस्लिम गट म्हणून काश्मीर आणि इतर कोणत्याही देशात राहणाऱ्या मुस्लिमांच्या हक्काबाबत बोलणे हा आमचा अधिकारच आहे,’’ असे शाहीन याने सांगितले. काही दिवसांपूर्वीच कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानच्या राजकीय गटाचा प्रमुख म्होरक्या शेरमहंमद अब्बास स्टानेकझाई याची दोहा येथे भेट घेतली होती. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी होऊ नये, असे भारताने त्याला बजावले होते.
हक्कानी नेटवर्कवर होणारे आरोपही सुहेल शाहीन याने आज फेटाळले. हक्कानीविरोधातील सर्व प्रचार हा केवळ आरोपांवर आधारित आहे. हक्कानी नेटवर्क ही संघटना नसून इस्लामिक अफगाणिस्तान अमिरातीचाच (आयईए) एक भाग आहे, असेही शाहीन याने स्पष्ट केले.
अल कायदाकडून चिथावणी
अफगाणिस्तानच्या ‘स्वातंत्र्या’नंतर आता मुस्लिमांनी सर्व मुस्लिम प्रदेश मुक्त करावेत, अशी चिथावणी अल कायदा या दहशतवादी संघटनेने दिली आहे. जिहादसाठी त्यांनी काही प्रदेशांची नावेही दिली आहेत. या यादीत इराक, सीरिया, जॉर्डन, लेबनॉन, लीबिया, मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया, सोमालिया, येमेन या देशांसह काश्मीरचाही समावेश आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.