यवतमाळ : पूर्वी हृदयरोग हा केवळ वृद्धांना होणारा आजार आहे, असा समज रूढ होता. मात्र, गेल्या काही वर्षांत तरुण वर्गात हृदयरोगाचा प्रभाव वाढत आहे. अगदी उमेदीच्या काळात तरुणाई हृदयरोगाच्या विळख्यात अडकत आहे. कित्येकांना जीवही गमवावा लागत आहे. त्यामुळे अज्ञानी न राहता, सजक व्हावे, असे मत हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सतीश चिरडे यांनी व्यक्त केले.
४० ते ४५ वर्षे वयोगटातील तरुणांचा हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या लक्षणीय वाढली आहे. एका सर्वेक्षणानुसार देशात दररोज नऊ हजार व्यक्ती हृदयाच्या आजाराने मृत्युमुखी पडतात. प्रती दहा सेकंदाला एक आणि त्यापैकी नऊशे मृत्यू ४० वर्षांखालील तरुणांचे होतात. तरुणांच्या या दुरवस्थेला आजाराविषयीचे अज्ञान, चुकीची जीवनशैली व योग्य उपचार न मिळणे ही प्रमुख कारणे आहेत. पालकांनी मुलांचे वजन किंवा लठ्ठपणा वाढू नये, याची लहानपणापासूनच काळजी घेणे गरजेचे आहे, असा सल्ला डॉ. चिरडे यांनी दिला.
आधीपासूनच वजन नियमित ठेवल्यास तरुणपणी उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या तक्रारी वाढणार नाहीत व त्यांना हृदयरोगाचा सामना करावा लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. छातीत दुखणे, श्वास घेताना घाम येणे, खांदे, मान जबड्याला वेदना होणे ही हृदयरोगाची सर्वसाधारण लक्षणे आहेत. हृदयक्रिया बिघडणे, झटका येणे, हृदयक्रिया बंद पडणे, असे आजाराचे स्वरूप आहे.
कार्डियाक अरेस्ट यात हृदयाचे रक्ताभिसरणाचे कार्य थांबते. परिणामी इतर अवयवांना प्राणवायूचा पुरवठा होण्यात अडथळा निर्माण होतो. मेंदूलाही प्राणवायूचा पुरवठा होण्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे शुद्ध हरवते ही एक वैद्यकीय आणीबाणी असून, त्वरित उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावतो. धूम्रपान, मद्यपान, चुकीचा आहार विहार, व्यायामाची कमतरता, बैठी जीवनशैली या बाबी ब्लॉकेजला कारणीभूत ठरतात. मधुमेह, रक्तदाब यासारखे आजारदेखील हृदयाचे आजार जडण्यास कारणीभूत ठरतात.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.