नैराश्यावर मात कशी करायची? वाचा आनंदी राहण्याचे सोपे उपाय

happiness
happiness

पुणे - नैराश्य ही मानसिक आजाराची आणि त्यानंतर येणाऱ्या शारीरिक आजारांची सुरुवात असते. मनात घर करून बसलेली खिन्नता, सतत उदास वाटणे, कोणत्याही गोष्टीत रुची न वाटणे, ही महत्त्वाची लक्षणे. दैनंदिन जीवनातही बिघाड निर्माण करणारी. केवळ नैराश्याची कारणे समजून घेऊन उपयोग नाही. त्यावर मार्ग काय, याचा विचार करणे महत्त्वाचे. 

नैराश्य दूर करण्याचे उपाय आपल्या हातात नव्हे तर, आपल्या शरीरातच आहेत आणि आपण मात्र असहाय्य होऊन, दुःखी होऊन राहतो. खरे तर हे सगळे कळत असते, पण नैराश्य ही स्थिती अशी आहे की सगळे कळते पण वळत मात्र नाही. तेव्हा मनाला आनंदाच्या दिशेने वळवू शकेल, निदान दुःखी मनःस्थितीकडे पाठ फिरवायला लावू शकेल, असे कोणते तरी सकारात्मक बळ हवे. निराश मनःस्थितीला नैसर्गिक तऱ्हेने आनंदी बनवणे हा अगदी सोपा उपाय आहे. नैसर्गिक तऱ्हेने म्हणजे ‘न्यूरो केमिकल्स’चे प्रमाण वाढवून. 

नैसर्गिक तऱ्हेने ‘न्यूरो केमिकल्स’चे प्रमाण कसे वाढेल?

- स्वतःची दैनंदिनी बनवा 
दिवसाची छोटी-छोटी ध्येये लिहून काढा. स्वयंशिस्तीचे बळ फार मोठे असते. त्यातून येणारे समाधान आणि स्फूर्ती ही तुम्हाला अधिकाधिक आत्मविश्वास आणि आनंद देते. 

- नवनवीन गोष्टी शिकत राहा 
त्यातून तुमची तत्परता, जीवनाबद्दलचे कुतूहल वाढत राहाते. आयुष्य किती अद्भुत आणि आनंदमय आहे हे पुन्हा पुन्हा जाणवते. 

- कमीत कमी आणि गरजेपुरते खा 
जास्त खाण्याची आवश्यकता नसतेच मुळी. जास्त खाणे, तुमच्यातील जडत्व वाढवून तुमच्यातील तत्परता आणि उत्साह कमी करते. काय खातो याकडे लक्ष ठेवा. जितके नैसर्गिक आणि कच्चे खाणे खाता येईल तेवढे खा. भुकेवरच्या नियंत्रणानेही आत्मविश्वासाचे बळ वाढते. यासाठीच उपवास असतात, साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी नव्हे. शिजवलेले अन्न चवीसाठी, तर नैसर्गिक अन्न सतेज मन आणि शरीरासाठी आहे. 

- गरम पाण्याने स्नान करा 
दिवसातून दोनदा गरम पाण्याने अंघोळ केल्याने निरुत्साह पळून जातो. रात्री अंघोळ केल्याने झोपही छान लागते. 

- नियमित व्यायाम करा 
व्यायामाला आपला मित्र बनवा. व्यायाम करताना आपल्या शरीरात एन्डोर्फिंन्स स्त्रवतात. शरीरातील वेदना आणि मनाचीही वेदना कमी करतात. स्वतःतील सकारात्मक भावना वाढवतात. 

-आनंदाने राहा, विश्वासाने राहा 
संशय, असमाधान, निखळ दृष्टी न ठेवणे या गोष्टी आपल्या भोवतालच्या आपले रक्षण करणाऱ्या प्रतिकार क्षमतेच्या आवरणाचा भेद करतात. तर आनंद, दुसऱ्यांबद्दलचा स्नेह, प्रेम, विश्वास या गोष्टी हे आवरण जास्तीत जास्त सशक्त बनवतात. 

तुम्ही मनाला निराशेच्या दिशेने वळू देऊ शकता, तर मनाची तीच शक्ती वापरून तुम्ही आनंदाच्या दिशेलाही वळवू शकता. जेव्हा मनाशी तुम्ही खूणगाठ बांधता, की मला ही गोष्ट करायचीच आहे, मी हे करणारच. तेव्हा तुमचे शरीर, शरीरक्रिया आणि शरीर रसायने तुम्हाला आनंदाने साथ देतील आणि नैराश्य, आजारपण तुमच्यापासून कुठल्या कुठे दूर पळून जाईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com