मासिक पाळीच्या 'त्या' पाच दिवसांबद्दल समज अन् गैरसमज...एकदा वाचाच!

periods 1.jpg
periods 1.jpg

नाशिक : मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे स्त्रीला मातृत्वाचा अनुभव घेता येतो. मात्र, याबाबत पूर्वीपासून अनेक गैरसमज आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून जाहीर केला आहे. मासिक पाळीबाबत सामाजिक गैरसमज दूर व्हावेत...अन् महिलांचे खच्चीकरण होऊ नये, यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांचे पुढे दिलेले मत महिलांचा मानसिक त्रास टाळणार...

या संवेदनशील विषयाला समजून घ्यावे

मासिक पाळीबाबतचे समाजातील गैरसमज दूर होणे गरजेचे आहे, असे मत स्त्रीरोगतज्ज्ञांनी व्यक्‍त केले. महिलांचा मानसिक त्रास यातून टळू शकेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस अनेकांना माहीत नसला, तरीही जागतिक स्तरावर त्याला फार महत्त्व आहे. अनेकदा मासिक पाळीसंदर्भात असलेल्या गैरसमजांमुळे अनेक महिलांना समस्यांना सामोरे जावे लागते. व्यापक दृष्टिकोनातून समाजाने या संवेदनशील विषयाला समजून घ्यायला हवे, असे मत यानिमित्त व्यक्‍त केले. 

पूर्वी मासिक पाळीत देवपूजा किंवा स्वयंपाक करू नका, असे महिलांना सांगितले जायचे. त्याला वैज्ञानिक दृष्टीने काही कारणे होती. मासिक पाळीत महिलांना आरामाची गरज असते. त्यामुळे महिलांना घरकाम करू दिले जात नव्हते. त्याला आता अंधश्रद्धेच स्वरूप आले आहे. अनेक महिला आजही प्रथा म्हणून घरात स्वयंपाक आणि देवपूजा करीत नाहीत. आराम मिळण्याऐवजी महिलांना या दिवसांत कपडे धुणे यांसारखी अनेक कामे करावी लागतात. - डॉ. चेतना दहीवेलकर, स्त्रीरोगतज्ज्ञ 

मासिक पाळी हे चक्र आहे. काही महिलांना लवकर येते, तर काहींना उशिरा येऊ शकते. साधारणतः 24 ते 35 दिवसांत कधीही येऊ शकते आणि हे सामान्य चक्र आहे. मात्र, 24 दिवसांच्या आधी किंवा 35 दिवसांनंतर पाळी येणे सामान्य नाही, असे असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. - डॉ. उमेश मराठे, स्त्रीरोगतज्ज्ञ 

जवळपास प्रत्येक महिलेला मासिक पाळीत केस धुवू नये, असे सांगितले जाते. केस धुतल्याने रक्तस्त्राव कमी होतो. कमी रक्त गेले, तर ते रक्त पोटात राहून बाई जास्त दिवस अपवित्र राहाते, अशी समजूत आहे. मात्र, हा केवळ गैरसमज आहे. पाळीच्या दिवसांत महिलांनी अधिक स्वच्छता ठेवली पाहिजे. साधारणतः पाळीच्या पहिल्या दिवशी रक्तस्राव कमी असतो. दुसऱ्या- तिसऱ्या दिवशी अधिक असतो. चौथ्या दिवशी पुन्हा कमी होतो. केस धुतल्याने त्यावर कोणताही परिणाम होत नाही. - डॉ. निवेदिता पवार, स्त्रीरोगतज्ज्ञ 

मासिक पाळीत नेहमीचे व्यायाम करावेत. मात्र, अतिशय जास्त काम आणि व्यायाम टाळावा. रोजची दिनचर्या भंग करण्याची गरज नाही. या दिवसांत संतुलित आहार आणि जास्तीत जास्त पाणी प्यावे. आवश्‍यकता भासल्यास डॉक्‍टरांचे मार्गदर्शन घ्यावे. - डॉ. वर्षा बस्ते, स्त्रीरोगतज्ज्ञ 

मासिक पाळी नैसर्गिक आहे. प्रत्येक सस्तन प्राण्याला ती येत असते. यात गर्भपिशवीचे अस्तर दर महिन्याला गळते आणि रक्तस्त्राव होतो. मासिक पाळीमधील रक्त आणि शरीरातील रक्त वेगळे असते. मात्र, हा केवळ गैरसमज आहे. - डॉ. रवींद्र शिवदे, स्त्रीरोगतज्ज्ञ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com