चेतना तरंग  : मनातील अंतर्विरोध

sri-sri-ravishankar
sri-sri-ravishankar

प्रदीर्घ, खोलवर आणि कसलाही व्यत्यय न येता साध्य होणारी ध्यानधारणा ही आपल्याला आत्मतत्त्वाच्या सान्निध्यात घेऊन जाते. प्रत्येक वेळी ध्यानाला बसल्यावर पहिल्यापेक्षा तुमचे ध्यान अधिक खोलवर लागते; परंतु लगेच काहीतरी घडते, कधी विचार बाहेर पडतात, मनात खोलवर दडलेले संस्कार उभारून वर येतात आणि मग अचानक ध्यानाची सखोलता नष्ट होते. तुम्ही ध्यान धारणेचा सराव करायला लागाल, तसा तुमच्या स्वभावात फरक पडायला लागतो, हे तुमच्या लक्षात येईल. ज्या लोकांनी ध्यानधारणा करायला नव्यानेच सुरुवात केलेली असेल, त्यांच्या बाबतीत ध्यान प्रक्रिया स्वत:च्या मतानुसार आळोखे पिळोखे देत, सखोलता साध्य करेल. ध्यानधारणा ही एक प्रक्रिया आहे. म्हणून त्यात पूर्णत्व जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत तुमचे प्रयत्न सोडू नका. ध्यानातून नेमके साध्य काय होते? ध्यानाचा मुख्य उद्देश हा अंतर्बाह्य एकात्मता साध्य करण्याचा असतो; तुमच्यात आनंद, प्रेम आणि सजगता यांचे उस्फूर्त कारंजे निर्माण करण्याचा असतो. खोल आणि दीर्घ ध्यान धारणेमुळे तुमच्यातले द्वैत संपुष्टात येते. तुम्ही जसे अंतस्थ असता तसेच बाहेरही राहता. अंतस्थ स्वभाव आणि वरपांगी इतरांना दर्शवण्याचा  स्वभाव यातला फरक नाहीसा होतो. कारण तुम्ही शरीर नसता तुम्ही विचार नसता, तुम्ही भाव-भावना नसता तर तुम्ही एक शांती असता, तुम्ही आनंद असता.

गाढ झोपेमध्ये सगळ्या वृत्ती आपल्या मुळांमध्ये तल्लीन होतात. मनाचे अस्तित्व तिथे असल्यामुळे अति गहन अंतर्ज्ञान तिथे उपलब्ध नसते. ‘निर्विकल्प समाधीमध्ये’ अद्वैत्वाचे ब्रह्मज्ञान प्राप्त होते. ब्रह्माकार वृत्ती ब्रह्मात विलीन होतात. खरेतर झोप ही सुद्धा ध्यान धारणेसारखीच असते. झोपेतसुद्धा द्वैतभाव नसतो. तुम्ही अद्वैतभावातच असता, परंतु त्यात जागरूकतेचा अभाव असतो. झोपेत तुम्हाला तुमच्या अवती भोवती काय चालले आहे याची जाणीव नसते. पण झोपेतून जागे झाल्यावर मात्र तुम्हाला आनंदी आणि प्रसन्न वाटते. गाढ झोपेनंतर प्रत्येक वेळी तुम्हाला प्रसन्नचित्त, आनंदी, ताजेतवाने आणि मोकळे वाटते. ध्यान धारणेप्रमाणे झोप सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी देते पण ध्यान हे झोपेतून मिळणाऱ्या गोष्टींपेक्षा बरेच जास्त काहीतरी देऊन जाते, जे झोपेने मिळू शकत नाही.

निर्विकल्प समाधीमध्ये तुम्ही जेव्हा ध्यान धारणेच्या कळसापर्यंत पोहोचता तेव्हा त्या अवस्थेत विचार लोप पावतात, तेथे द्वैतभाव नसतो. ती अवस्था तुम्हाला जीवनाचा मधुकुंभच बहाल करते, आनंद आणि प्रसन्नता, जे जीवनाचे सार आहे ते तुम्हाला ती अवस्था बहाल करते. आनंद आणि प्रसन्नता मिळविण्यासाठी मन आतुर झालेले असते. ‘मला ते कसे मिळेल?’ याचाच शोध मन नेहमी घेत असते. मनाच्या या इच्छेला खतपाणी घाला, मनाची ही इच्छा सतत जागृत ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com