श्रीमद्‌भगवद्‌गीतेतील आरोग्यसंदेश

श्रीमद्‌भगवद्‌गीतेचा उगम जरी भारतात झाला असला तरी यातले ज्ञान संपूर्ण विश्र्वात समत्व राखण्यासाठी सक्षम आहे. म्हणूनच यातील तत्त्वज्ञानाची भुरळ पडली नाही असा तत्त्वज्ञानी शोधून सापडणार नाही.
Family
FamilySakal

श्रीमद्‌भगवद्‌गीतेचा उगम जरी भारतात झाला असला तरी यातले ज्ञान संपूर्ण विश्र्वात समत्व राखण्यासाठी सक्षम आहे. म्हणूनच यातील तत्त्वज्ञानाची भुरळ पडली नाही असा तत्त्वज्ञानी शोधून सापडणार नाही. श्रीमद्‌भगवद्‌गीतेची विशेषता ही की यातील ज्ञान गेयरूपात आहे. संगीतात अशी जादू असते की गाण्यातल्या अर्थाचा संपूर्ण बोध झाला नाही तरी त्याच्या स्पंदनामार्फत संकल्पना ऐकणाऱ्यापर्यंत पोहचवता येतात.

म्हणून केवळ श्रीमद्‌भगवद्‌गीताच नव्हे तर संपूर्ण विस्ताराने सांगितलेले वेदवाङ््मयही गेय व संगीतमय असे आहे. श्रीमद्‌भगवद्‌गीता ही संपूर्ण वेद-उपनिषदांतील ज्ञानाचे सार आहे किंवा सर्व भारतीय तत्त्वज्ञानातला मूळ सिद्धान्त आहे असे काहीही म्हटले तरी हरकत नाही. यात जीवन सुखी म्हणजे संतुलित करण्यासाठी तत्त्व सांगितलेले आहे.

संतुलन अशासाठी की जोपर्यंत संपूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरणारे ग्रह, नक्षत्र, तारे आपापल्या कक्षेत, आपापल्या आसाभोवती नियमात फिरत राहतात व त्या सर्वांचे मिळून एक संतुलन असते तोपर्यंत सर्व सुंदर असते, तोपर्यंत विश्र्वाचे आरोग्य उत्तम राहते असे म्हणता येते. मात्र एखादा बारीकसा ग्रह कक्षेच्या बाहेर गेला तर मोठा अनर्थ ओढवू शकतो व भीती उत्पन्न करतो.

म्हणूनच श्रीमद्‌भगवद्‌गीतेत ‘समत्वं योग उच्यते’ असे म्हटलेले आहे. सर्वांना एकत्रित ठेवण्यासाठी समत्वाची आवश्यकता असते. आयुर्वेदात ‘समदोषः समाग्निश्र्च समधातुमलक्रियाः’ असे सांगितलेले आहे. म्हणजे वात-पित्त-कफ हे दोष समत्वामध्ये, जाठराग्नीपासून धात्वग्नींपर्यंतचे सर्व अग्नी समत्वामध्ये, मलमूत्रादी मल समत्वामध्ये असणे आवश्यक आहेतच, पण त्याहीपलीकडे जाऊन आत्मा, इंद्रिये, मन हे सुद्धा समत्वात असावीत असे सांगितले आहे.

एखादा मनुष्य सज्जन असला पण त्याला एखादा आजार असला किंवा एखादा मनुष्य धष्टपुष्ट, ताकदवान असला पर डोक्याने तिरकस असला तर त्याचेही आरोग्य चांगले आहे असे म्हणता येणार नाही. शरीर, इंद्रियव्यापार, कर्म करण्याची शक्ती, विश्र्वातून आनंद घेण्याची शक्ती, समाजातील इतरांबरोबर नांदण्याची शक्ती, विश्र्व पुढे चालू राहावे म्हणून प्रजोत्पादनाची शक्ती या सर्व गोष्टी समत्वात असल्या पाहिजेत.

सर्व प्राणिमात्रांत आहार, निद्रा, भय, मैथुन या चार गोष्टी असतात. या चार गोष्टी व्यवस्थित चालल्या तर प्राणी ज्याप्रमाणे आयुष्य जगतात त्याप्रमाणे मनुष्यालाही राहता येऊ शकते. परंतु मनुष्याला या चार गोष्टींपलीकडे एक महत्त्वाची गोष्ट मिळालेली आहे व ती म्हणजे त्याचा मेंदू. विश्र्वाची चिंता करता यावी किंवा विश्र्व समजून घेता यावे यासाठी मनुष्याला मन, बुद्धी, अहंकार या गोष्टी मिळालेल्या आहेत. तसेच चैतन्याचे भान असण्यासाठी व चैतन्याशी संबंध जोडून पूर्णत्वाकडे आणि समाधानाकडे जाण्यासाठी त्याला वेगळी शक्ती मिळालेली आहे.

त्यामुळेच श्रीमद्‌भगवद्‌गीतेमध्ये सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. ‘दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्‌’ असे श्रीमद््भगवद््गीतेत म्हटलेले आहे. म्हणजे मनुष्यमात्राच्या भोवती उत्पन्न झालेला किंवा त्यानेच उत्पन्न केलेला सर्व पसारा, मग तो घरादाराचा असेल, जमीनजुमल्याचा असेल, पैशाअडक्याचा असेल, नात्यागोत्यांचा असेल, व्यवसाय-नोकरीचा असेल तो माझा (स्वजनं- ममत्व भाव) आहे असे मनुष्य मानतो.

मनुष्याचे सर्व काही स्वतःभोवती फिरत असतेच. यातून फायदे-तोटे उत्पन्न झाले. यात जणू सर्व आजारांचे मूळ असलेले दिसते. या संपूर्ण पसाऱ्यात जणू काही माझ्यावरच सर्व जबाबदारी आहे, मीच सर्व पसारा चालवणार आहे आणि ते मनासारखे न झाल्याने जो क्रोध उत्पन्न होतो, त्यातून मनुष्याला मिळालेल्या विशेष सिद्धींमध्ये अडथळा उत्पन्न होतो. यावर श्रीकृष्ण सांगतात की या ममत्व भावाच्या आहारी जायचे नसेल तर हे मनुष्या, तुझ्या सगळ्या इंद्रियांवर संयम ठेवण्यासाठी प्रयत्न कर.

आयुर्वेदात आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे तीन जीवनाचे आधारस्तंभ असतात असे सांगितलेले आहे. श्रीमद्‌भगवद्‌गीतेत इन्द्रियसंयम पर्यायाने ब्रह्मचर्याचे महत्त्व तर अनेक ठिकाणी सांगितलेले आहे पण पुढील एकाच श्र्लोकात आहार आणि निद्रा यांचे संतुलन कसे आवश्‍यक असते हे सांगितलेले आहे, नात्यश्र्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्र्नतः । न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥...श्रीमद्भगवद्गीता अध्याय ६-१६

जी व्यक्ती अतिप्रमाणात आहार घेते किंवा अजिबातच काही खात नाही, जी व्यक्ती अतिप्रमाणात झोपते किंवा अजिबातच झोपत नाही त्या व्यक्तीला हे अर्जुना, श्रीमद्‌भगवद्‌गीतेत सांगितलेला योग सिद्ध होत नाही. आयुर्वेदातले ‘समत्व’, ‘संतुलन’येथे श्रीकृष्ण अर्जुनाला समजावत आहेत. संदर्भ वेगळा असला, उदाहरणे वेगळ्या प्रकारची दिली असली तरी आपल्या सर्व आचरणात संतुलन ठेवले, कशाचाही अतिरेक होऊ दिला नाही तर आरोग्य मिळेलच पण मनःशांती, समाधान यांचाही अनुभव घेता येईल.

कष्टसाध्य, असाध्य असे रोग पुढे येण्यापूर्वीच मनुष्याने आपणहून काळजी घेणे अपेक्षित आहे. मनुष्याचे मन सैरभैर होऊन धावायला लागणे, झोप येईनाशी होणे, स्त्री-पुरुषांची सृजनाची शक्ती कमी होणे, जेवण नकोसे वाटणे असे होण्यापूर्वीच शरीरशुद्धी करणे व समत्वात येणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. भगवंतांनी मनुष्याला जाणीव करून दिली, ‘अहं वैश्र्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः’ म्हणजे, भगवंत म्हणतात ‘‘अन्न पचवण्याचे काम मी करतो, त्यात निदान ढवळाढवळ करू नका, पचन ही शरीरात निसर्गतः आलेली शक्ती आहे त्यात अडथळा आणू नका, नैसर्गिक राहा, स्वतःच्या प्रकृतीला मानवेल तेच खा, योग्य वेळी झोपा, योग्य मैथुन ठेवा.’’

याच्याच बरोबरीने भगवंतांनी म्हटले आहे, ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्‌ माम्‌ अनुस्मरन्‌ । यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम्‌ ॥८-१३।।

‘माझे सर्व सांगणे मी ॐ या एका अक्षरात सांगितले. त्याच्याशी समरस होऊन ॐकार गावा.’ परमेश्र्वर काय म्हणतो हे समजून घेतले, परमेश्र्वराची विश्र्वाबद्दल काय कल्पना आहे हे समजून घेऊन आतल्या ‘स्व’शी संभाषणात, संवादात राहणारी प्रज्ञा जागृत करण्याचा किंवा त्या प्रज्ञेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा असे श्रीमद्‌भगवद्‌गीतेत सांगितलेले आहे.

भौतिक व भौतिकाच्या पलीकडे असलेले अस्तित्व यांचे समत्व साधून जीवन आनंदी करण्याचा, आरोग्यवान करण्याचा संदेश श्रीमद्‌भगवद्‌गीतेत दिलेला आहे. आजच्या श्रीगीता जयंतीच्या निमित्ताने सर्वांना या जीवनग्रंथाचा अभ्यास करण्याची आणि त्यातील मूल्ये जगण्यात उतरवण्याची प्रेरणा मिळो हीच श्रीकृष्णांच्या चरणी प्रार्थना!

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com