
Gadchiroli Faces Malaria Crisis: मलेरियाचा सर्वाधिक धोका असलेल्या देशातील २५ जिल्ह्यांत गडचिरोलीचा समावेश आहे. महाराष्ट्रातील मलेरियाच्या एकूण रुग्णांत गडचिरोलीचा वाटा तब्बल ५० टक्के एवढा आहे.
त्यामुळे मलेरियाचे उच्चाटन करण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. यासाठी ज्येष्ठ समाजसेवक तथा ‘सर्च’ या संस्थेचे संचालक डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेत स्वतंत्र टास्क फोर्सही स्थापन करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासीबहुल सहा तालुक्यांत मलेरियाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. या तालुक्यांतून मलेरियाचे उच्चाटन करण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सची बैठक ‘शोधग्राम’ येथे नुकतीच झाली.
टास्क फोर्सच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेत स्वतंत्र समिती कार्यरत असून त्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या बैठकीत गडचिरोलीतील मलेरियाची सद्यःस्थिती सादर करण्यात आली होती.
गडचिरोली जिल्ह्यातील एकूण बारा तालुक्यांपैकी सहा आदिवासीबहुल तालुक्यांत मलेरियाचा धोका सर्वाधिक आहे. एक वर्षांत एक हजार लोकसंख्येमागे किती मलेरिया रुग्ण आढळले याला ॲन्युअल पॅरासाईट इंडेक्स किंवा एपीआय म्हणतात. हा निर्देशांक दोनपेक्षा जास्त असेल तर त्या भागात मलेरियाचा जास्त भार (हाय बर्डन) म्हटले जाते.
२०२१च्या आकडेवारीनुसार भामरागड येथे हा एपीआय सर्वाधिक म्हणजे १७४.६३ इतका आहे. कोरची (८.९९), कुरखेडा (३.४१), धानोरा (१८.६४), एटापल्ली (१९.८८) आणि अहेरी (६.५६) येथेही हा एपीआय जास्त आहे. म्हणजेच या तालुक्यातील एकूण ४ लाख ६२ हजार लोकसंख्येला मलेरियाचा धोका आहे. उरलेल्या ६ तालुक्यांमधील सिरोंचा तालुक्यात हा एपीआय (२.७८) इतका आहे. इतर तालुक्यांचा विचार केला तर वडसा (०.१२), आरमोरी (०.६५), गडचिरोली (१.७८), चामोर्शी (१.५८) आणि मुलचेरा (१.३६) येथील मलेरियाचा भारअल्प आहे.
भामरागड तालुक्यातील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणारा परिसर हा गडचिरोलीतील मलेरियाचा केंद्रबिंदू मानला जातो. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांनुसार विचार केला तर २७ प्राथमिक आरोग्य केंद्रांत मलेरियाचा जास्त भार आहे.
मलेरियाला कारणीभूत ठरणारा जंतू म्हणजे प्लाजमोडियम होय. संसर्ग झालेल्या रुग्णांचा चावा घेतलेला डास इतरांना चावतो आणि त्यातून मलेरियाचा फैलाव होतो. म्हणून आताची वरवर कमी वाटणारी रुग्णसंख्याही गांभीर्याने घेण्याची गरज आहे. चारपैकी पी. फाल्सीपेरममध्ये रक्तपेशींचे विघटन होणे आणि मेंदूला इजा होणे, अशी गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे या प्रकारचा मलेरिया धोकादायक ठरतो. लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती मातांसाठी मलेरिया विशेष जीवघेणा ठरू शकतो. मलेरियाचे उच्चाटन होऊ शकले, तर डासांपासून पसरणाऱ्या डेंगी, चिकनगुनिया, जापनीज एन्सेफलायटीस या आजारांवरही नियंत्रण मिळवता येते.
गडचिरोलीच्या ७६ टक्के भूभागावर जंगल आहे. घनदाट जंगल, डोंगर, पाण्याचे साठे ही स्थिती डासांच्या वाढीसाठी पोषक ठरते.
मलेरियाचा उद्रेक पावसात सर्वाधिक असतो. याच काळात जिल्ह्यातील जवळपास २१२ गावांचा संपर्क तुटतो. या गावांना आरोग्य सुविधा पुरवणे कठीण होऊन बसते.
बरीच गावे मुख्य रस्त्यापासून दूर आहेत अशा गावांना आरोग्य सुविधा पुरवणे अनेकदा शक्य होत नाही किंवा वेळेत उपचार मिळत नाहीत.
बरेच लोक औषधोपचारासाठी पारंपरिक उपचार करणाऱ्यांवर (उदा. पुजारी, बैगा, पेरमा) अवलंबून असतात.
गडचिरोली जिल्ह्याला मलेरियाचा सर्वाधिक धोका असल्याने मलेरियाचे पूर्ण उच्चाटन गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य आणि सहभाग आवश्यक आहे. थंडी वाजून ताप येत असेल तर तातडीने तपासणी करून घ्यावी. नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास गडचिरोली जिल्हा नक्कीच मलेरियामुक्त होऊ शकतो.
-डॉ. सुप्रियालक्ष्मी तोटीगेर
सदस्य, मलेरिया टास्क फोर्स, गडचिरोली
भारतात मुख्यतः पी. फाल्सीपेरम, पी. व्हायवॅक्स, पी. मलेरिया आणि पी. ओव्हेल या चार प्रकारचे मलेरियाचे विषाणू आढळतात. २०२४ मध्ये गडचिरोलीत ६ हजार ६८४ इतके मलेरियाचे रुग्ण होते. तर मलेरियामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १४ होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.