
Vahbiz Dorabjee's Health Journey After Quitting Daily Soap: अभिनय क्षेत्र म्हटलं की अनियमित वेळापत्रक, वेळीअवेळी जेवण, अपुरी झोप यामुळे कलाकारांच्या आरोग्यावर परिणाम होतो यात वादच नाही. परंतु याव्यतिरिक्त आधीपासूनचे आजारपण किंवा कामाच्या ताणामुळे झालेल्या आरोग्याच्या समस्या हे देखील अनेक कलाकारांच्या बाबतीत आपल्याला दिसून येते.
असंच एका टिव्ही अभिनेत्री वाहबिज दोराबजी बाबतीत घडलं आहे. प्यार की येह एक कहानी मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असलेली वाहबिजला काही आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. तिला जेव्हा ‘दीवानियत’ या टीव्ही शोसाठी शूटिंग करावं लागत होतं, तेव्हा तिची ब्लड शुगर लेव्हल ५०० पर्यंत पोहोचली होती. मात्र, कामाचा तणाव इतका होता की शरीराकडे लक्ष द्यायलाच वेळ नव्हता. काम संपल्यानंतर जेव्हा स्वतःकडे लक्ष दिलं, तेव्हा कळलं की आरोग्यावर किती वाईट परिणाम झाला आहे.
नवभारत टाइम्ससोबत संवाद साधताना वाहबिज म्हणाली की, सुरुवातीला थायरॉईड आणि नंतर डायबिटीजमुळे शरीरामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या. सतत थकवा, स्नायूंमध्ये अखडलेपणा आणि वेदना जाणवू लागल्या. पण शूटिंग सुरूच होतं. ‘बहू हमारी रजनीकांत’ नंतर ‘दीवानियत’मध्ये तिने बबिता चौधरी ही नकारात्मक भूमिका साकारली. या शोदरम्यान ती दोन्ही आजारांशी झुंजत होती असंही ती म्हणाली.
वाहबिज सांगते, “शूटिंगदरम्यान अनेकदा माझी शुगर लेव्हल ५०० च्या पुढे गेली होती. पण मी काम थांबवलं नाही. शो बंद झाल्यावर जेव्हा थोडा वेळ स्वतःसाठी मिळाला, तेव्हा माझी तब्येत पाहून डॉक्टरही चकित झाले. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, आता ब्रेक घेणं गरजेचं आहे.”
"माझ्या तब्येतीत बिघाड होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे तणाव. अभिनयाची आवड होती म्हणून मी काम करत राहिले, पण सततच्या मानसिक दडपणामुळे हार्मोनल बदल झाले आणि वजन झपाट्याने वाढू लागलं," असं त्या स्पष्ट करतात.
शो संपल्यानंतर वाहबिजने योगा, प्राणायाम, मेडिटेशन आणि मंत्राचा जप करून ध्यान करणे आपल्या दैनंदिन आयुष्यात समाविष्ट केले. तिच्या योगा प्रशिक्षिका सुहानी यांनी तिच्या शारीरिक स्थितीनुसार विशेष योगासने सुचवली. या उपचारांमुळे तिचं अखडलेलं शरीर मोकळं होऊन लवचिक होण्यास मदत झाली आणि शरीर हलकं वाटू लागलं.
“प्राणायाम आणि मेडिटेशनमुळे मला मानसिक शांतता मिळाली. मी श्वास कसा घ्यावा याकडे कधीच लक्ष दिलं नव्हतं, पण प्राणायाम केल्यावर लक्षात आलं की शरीराला ऑक्सिजन कसा मिळतो याचं महत्त्व किती आहे,” असं वाहबिज सांगते.
आपल्या अनुभवांबद्दल सांगताना वाहबिज म्हणते, “जीवनात कठीण प्रसंग आले की, मी अधिक मजबूत झाले. अगदी घटस्फोटासारख्या प्रसंगातही मी हार मानली नाही. डॉक्टरांनीही सांगितलं की मी मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. पण आता समजतंय की, स्वतःला वेदना देणं चूकीचं आहे.”
ती पुढे म्हणते, “आज मी नियमित योगा, प्राणायाम आणि मंत्रजप करते. विशेषतः गायत्री मंत्र आणि ॐ च्या उच्चरामुळे मला शांतता मिळते. माझा आहारही बदलला आहे. आता ९०% वेळा मी शाकाहारी पदार्थ खात असते. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही ठिकाणी सकारात्मक परिणाम झाला आहे.”
“आता मी पूर्वीसारखी १२-१५ तास काम करत नाही. १७ व्या वर्षी काम सुरू केलं होतं. पण आता मला समजलंय की काम महत्वाचं आहे, पण त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे स्वतःचं आरोग्य.” असं वाहबिज नम्रपणे सांगते.
“आपण नेहमी या विचारात राहतो की कामाचं फळ काय मिळेल. पण त्याऐवजी रोज सकाळी उठून, योगा, प्राणायाम आणि व्यायामाद्वारे आपल्या तणावाला कमी करायला हवं. हा आरोग्यदायी आणि सुखी जीवनाचा सर्वात सोपा मार्ग आहे.”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.