कजगावची केळी हद्दपार

कजगाव स्थानकालगत ओस पडलेला रेल्वे मालधक्का
कजगाव स्थानकालगत ओस पडलेला रेल्वे मालधक्काesakal

जळगाव : पाणी... कृषीला व पर्यायाने अर्थव्यवस्थेला चालना देणारा प्रमुख घटक... तो शेती समृद्धही करतो आणि उपलब्ध नसेल तर अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्तही करतो... कजगाव परिसरात पाण्याअभावी केळीचे उत्पादन टप्प्याटप्प्याने कमी होत गेले व दोन दशकांत इथला गुणवत्तापूर्ण केळीचा ‘बाजार’ उठला तो कायमचाच. सोबत पाचशेवर जणांचा रोजगारही त्याने हिरावला. दोन-अडीच दशके होऊनही ही स्थिती अद्याप पूर्ववत होऊ शकलेली नाही, भविष्यात होऊ शकेल अशी शाश्‍वती नाही.

केळी उत्पादनात जळगाव जिल्ह्याचा देशभरात लौकिक आहे. देशांतर्गत नव्हे तर विदेशातही जळगावची केळी निर्यात होते. जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, भुसावळ तालुक्यासह चोपडा, शिरपूरपर्यंत केळी उत्पादन घेतले जाते. जिल्ह्याच्या अन्य भागातही केळी घेतली जात असली तरी ती अल्प प्रमाणात. त्यामुळे केळीच्या उत्पादनावर रावेर परिसराचे वर्चस्व कायम आहे, किंबहुना रावेर पट्ट्यालाच केळीचे आगर म्हणून देशभर मान्यताही मिळालीय.

कजगावची केळी होती अधिक गुणवत्तापूर्ण...
केळी उत्पादनात रावेरचा लौकिक असला तरी दोन-अडीच दशकांपूर्वी भडगाव तालुक्यातील कजगावची केळी रावेरच्या केळीला मात देणारी होती. ती अधिक गुणवत्तापूर्ण तर होतीच, शिवाय तिचा गोडवाही अधिक होता, असे सांगितले जाते.

पाण्याचा फरक...
रावेर परिसरातील केळी मुख्यत्वे तापीच्या पाण्यावर घेतली जाते. कजगाव परिसरात गिरणेच्या पाण्यावर केळी घेतली जात होती. तापीपेक्षा गिरणेचे पाणी अधिक नितळ, शुद्ध... परिणामी, कजगाव पट्ट्यातील केळीचा गोडवा अधिक होता... दोन-तीन दशकांपूर्वी गिरणेचे बऱ्यापैकी पाणी शेतीसाठी उपलब्ध व्हायचे, म्हणून या पट्ट्यातही विशेषत: कजगाव परिसरात केळी उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जायचे.

दररोज पाचशे क्विंटल
कजगाव फ्रूटसेल सोसायटीचे सदस्य असलेले हजारावर शेतकरी केळी उत्पादन घेत होते. त्यातून दररोज पाचशे ते सहाशे क्विंटल केळी कजगाव स्थानकावरील रेल्वे धक्क्यावर यायची. पाचशेपेक्षा अधिक मजूर काम करायचे. स्थानकाजवळ वीस-पंचवीस हॉटेलेही होती. दिल्लीपर्यंत येथील केळी रेल्वे वॅगन्सद्वारे जायची. पूर्णच्या पूर्ण रॅक येथून रवाना होत होते. कालांतराने गिरणेचे पाणी कमी होत गेले व केळीचे उत्पादनही घटत गेले. आता हंगामातही पाचशे क्विंटल केळी उत्पादन होत नाही. हजारावर केळी उत्पादकांची संख्या पन्नासही राहिलेली नाही. शेतकऱ्यांची जमीनही विभागली गेली, त्यामुळे अल्पभूधारक केळी उत्पादनाच्या भानगडीत पडत नाहीत. या केळीला पुरेसे पाणीही नाही. रोजचे उत्पादन पाचशेवरून ५० क्विंटलवर आलेय. त्यामुळे दोन दशकांपूर्वीचे केळी निर्यातीचे वैभव आता लयास गेलेय. कजगाव केळी धक्क्याची जागा सावदा स्थानकाने घेतलीय. त्यामुळे कजगाव परिसरातील पाचशेवर कामगारांचा रोजगारही या स्थितीने हिरावलाय.

कजगाव स्थानकालगत ओस पडलेला रेल्वे मालधक्का
मुक्ताई भवानी वनक्षेत्र ‘अभयारण्य’ घोषित

"दोन-अडीच दशकांपूर्वी कजगाव केळी निर्यातीचे केंद्र होते. बेभरवशाचा पाऊस, गिरणेला पुरेसे पाणी नाही, सिंचनाची सोय नसल्याने केळी उत्पादन दहा टक्क्यांवर आलेय. त्यामुळे कजगाव केळी मालधक्का बंद झाला."

-बी. वाय. पाटील, अध्यक्ष, फ्रूटसेल सोसायटी, कजगाव

कजगाव स्थानकालगत ओस पडलेला रेल्वे मालधक्का
Jalgaon : नाशिक पुरातत्व विभागाच्या पथकाची भुईकोट किल्ल्यास भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com