जळगाव : शिवाजीनगर पूल सुरू होण्याबाबत ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. पूल केव्हा सुरू होणार याकडेच नागरिकांचे लक्ष लागले असताना आता पुलावरून जुलैपासून वाहतूक सुरु करण्यात येईल, असा विश्वास मक्तेदार श्रीश्री इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक श्रीराम खटोड यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.
शिवाजीनगर पुलाचे बांधकाम सुरू होण्यास तीन वर्षे झाले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून तर पुलावरून वाहतूक सुरू होण्याबाबत अधिकाऱ्यांकडून नवीन तारीख दिली जात आहे. त्यामुळे आता नागरिक त्रस्त आहे. त्यामुळे आता पूल केव्हा सुरू होणार याबाबत नागरिक चिंतेत आहेत.
मक्तेदारांकडून ग्वाही
याबाबत पुलाचे मक्तेदार तथा श्रीश्री इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक श्रीराम खटोड यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, पुलाचे काम वेगात सुरू आहे. सद्य:स्थितीत या पुलाच्या कामावर १०० मजूर काम करीत आहेत. पुलाच्या कठड्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. आता मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू आहे. तो टाकून पूर्ण झाल्यानंतर पुलावर डांबरीकरण करण्यात येईल. हे काम साधारणत: १५ जूनपर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर १५ दिवस पुलाचे इतर कामे करण्यात येईल आणि जुलैपासून नागरिकांची या पुलावरून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्यानंतर पुलाच्या रंगरंगोटीचे काम सुरूच राहील.
''कार्यकारी अभियंता प्रशांत येळाई व आपण स्वत: या कामाची आज पाहणी केली. पुलाचे काम पूर्ण होण्याच्या स्थितीत आहे. या महिन्याच्या अखेरीस काम पूर्ण होऊन कोणत्याही परिस्थितीत १ जूलैपासून पुलावरून वाहतूक सुरू होईल.'' - सुभाष राऊत अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.