
अमळनेर (जि. जळगाव) : विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीवर आधारित शिक्षकांची संचमान्यता तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचा शासन निर्णय झाला आहे. सध्या २०२१-२०२२ ची संचमान्यता ही २०२०-२०२१ च्या संचमान्यतानुसार कायम ठेवाव्यात व पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव समीर सावंत यांनी दिल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यातील शाळांमध्ये अतिरिक्त ठरू शकणाऱ्या किंवा समायोजित होण्याची शक्यता असणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
दर वर्षी शालेय शिक्षण विभागातर्फे नव्याने संचमान्यता ठरविण्यात येते. प्रत्येक तुकड्यामागे किती शिक्षक असावे, याचे सूत्र म्हणजे संचमान्यता होय. यात शिक्षक-विद्यार्थी प्रमाण ठरलेले असते. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार संबंधित शाळेसाठी किती शिक्षकांची गरज आहे, हे ठरविले जाते. कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांची रिक्त असलेल्या ठिकाणी समायोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीनुसार शिक्षकांची संचमान्यता करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानुसार प्रक्रिया राबविण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीला ब्रेक लागला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची कमी पटसंख्यांअभावी शिक्षक अतिरिक्त ठरले असते. त्यातून अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनातही अडचणी येण्याची शक्यता होती. मात्र, आधार नोंदणीचे काम अपूर्ण असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीवर आधारित शिक्षकांची संचमान्यता तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्याने शिक्षकांना हायसे वाटले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीत अनेक त्रुटी आहेत. त्याची योग्य पद्धतीने दुरुस्ती होणे बाकी आहे. तांत्रिक दोषांमुळे विद्यार्थी शाळेत असतानाही, ते संचमान्यतेसाठी ग्राह्य धरले गेले नसते. परिणामी, पटसंख्या असतानाही शिक्षक अतिरिक्त ठरणार होते. संचमान्यतेबद्दल झालेल्या नवीन सूचना तातडीने सर्व शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापक व मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून त्याप्रमाणे पुढील योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही उपसचिव समीर सावंत यांनी दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.