Jalgaon News : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा सण मंगळवारी (ता. ९) साजरा होणार आहे. या शुभमुहूर्तावर शहरात सुमारे चारशे जण नवीन घरात प्रवेश करतील. ६० ते ७० चारचाकी, ७०० दुचाकींचे आरक्षण झाले आहे. नवीन हिंदू वर्षाची सुरवात सोने खरेदीने होणार आहे. सोन्याच्या दरात सोमवारी (ता. ८) ८०० रुपयांची वाढ झाली. सोन्याचा दर ७३ हजार ५४२ वर पोचला. हिंदू नवीन वर्ष चैत्र महिना गुढी उभारून सुरू होता.
साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असल्याने यादिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वाहन खरेदी, नवीन दुकान, उद्योगाचा शुभारंभ केला जातो. रेडीरेकनरचे दर यंदा मागील वर्षाचे आहेत. यामुळे घर खरेदी करताना अधिकचा मुद्रांक शुल्क द्यावा लागणार नाही. यंदा शहरात सुमारे चारशे घरांचे आरक्षण झाले आहे. बहुतांश भागात रस्ते होत असल्याने नागरिक रस्ते असलेल्या एरियात नवीन तयार घरांना पसंती देत आहे.
१५ लाखांपासून पुढे तयार घरांच्या किमती आहेत, अशी माहिती बांधकाम व्यावसायिकांनी दिली. नवीन मुहूर्तावर नवीन वाहन घरात आणले जाते. शहरातील विविध दुचाकीच्या शोरूममध्ये विचारणा केली असता, सुमारे सातशे नवीन दुचाकींचे, तर ६० ते ७० चारचाकी गाड्यांचे आरक्षण झाले आहे. ग्राहकांनी अगोदरच येऊन वाहनांचा रंग, मॉडेल, त्यातील सुविधांची पाहणी केली आहे. मंगळवारी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ते वाहने घरी नेतील.
सोन्याला मागणी कायम राहणार
सोन्याचे दर महिन्याभरापासून दिवसेंदिवस वाढत आहेत. सोमवारी सोन्याचे दर प्रतितोळा ७३ हजार ५४२ रुपये जीएसटीसह आहेत. दर वाढले, तरी ग्राहक सोने खरेदी थांबविणार नाहीत, अशी माहिती नवलखा ज्वेलर्सचे संचालक आदित्य नवलखा यांनी दिली. नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सोन्याल्या अधिक मागणी राहील. चांदीच्या दरात एक हजारांची वाढ होऊन चांदी प्रतिकिलो ८२ हजारांवर पोचली आहे. (latest marathi news)
इलेक्ट्रानिक वस्तूंचा मागणी
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. यामुळे नागरिक कुलर, फ्रीज, पंखे खरेदी करीत आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीत अधिक वाढ होईल. मिक्सर, वाशिंग मशिन, फ्रीज, आटा चक्की, फर्निचर, तयार सोफासेट, किचन सेट, एलइडी टीव्ही आदींनाही मागणी आहे. त्याची मागणी अधिक होणार आहे.
बासुंदी, श्रीखंडला मागणी
नववर्षाला गोडधोड केले जाते. यामुळे श्रीखंड, बासुंदी, खवा, आम्रखंड, चक्का, रबडी, पेढे या गोड पदार्थांची खरेदी सोमवारीच (ता. ८) करण्यात आली.
आंबे अद्याप महाग
यंदा आंब्याची आवक कमी असल्याने आंबे महागले आहेत. बेगमफल्ली आंबा दीडशे रुपये किलो आहे. ५०० पासून दोन हजारांपर्यंत हापूस आंब्याची पेटी (बारा आंबे) आहे. अक्षयतृतीयेपर्यंत आंब्यांची आवक वाढून दर सर्वसामान्याच्या आवाक्यात येतील, असे आंबे विक्रेत्यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.