फैजपूर (ता. यावल) : शहरासाठी मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध असल्यावर देखील पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील काही भागांत अवेळी व कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. (low pressure water in half of Faizpur Arbitrary)
शहराला पाणीटंचाई होऊ नये, यासाठी खिरोदा रस्त्यावर आठ कोटींची पाणीपुरवठा योजना आणण्यात आली. या ठिकाणी शहरासाठी गारबर्डीच्या सुकी धरणातून लोहारा पिकअप येथून पाणी आणण्यात आले आहे. खिरोदा रस्त्यावरील पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी पाणी साठविण्यासाठी सम तयार करण्यात आले.
तसेच शहरातील त्रिमूर्ती चौक, विद्यानगर, तहानगर, लक्ष्मकनगर व पाणीपुरवठा योजनेवरील जलकुंभाच्या माध्यमातून दिवसाआड सकाळी निम्मे व सायंकाळी निम्मे अशा दोन वेळेत पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुकी धरणात मुबलक पाणी उपलब्ध असल्यावर देखील पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे अनेक महिन्यांपासून शहरातील काही भागांमध्ये अवेळी व कमी दाबासह कमी वेळ पाणीपुरवठा केला जात आहे.
विशेष करून सायंकाळी शहरातील प्रभाग क्रमांक एक व दोनमध्ये पाणीपुरवठा केला जातो. या प्रभागात मजूर, शेतमजूर, हातमजुरी करणारे संमिश्र नागरिक रहिवासी आहेत. रात्री उशिरा वेळ निश्चित नाही, अशा वेळी पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे दिवसभर मोलमजुरी करून आलेल्या नागरिकांना पाण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागरण करावे लागते. हातमजुरीवर आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरणारे नागरिक अवेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्याने त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे सुरळीत पुरेसे पाणी मिळत नसल्याची समस्या नित्याने भेळसावत आहे.
पालिकेत प्रशासक व मुख्याधिकारी प्रभारी असल्याने पालिकेचे कामकाज वाऱ्यावर आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू असून, पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. सायंकाळी पाच ते सातदम्यान होणारा पाणीपुरवठा अनेक महिन्यांपासून रात्री दहा, साडेदहा किंवा अकरा, साडेअकराला केला जात आहे. त्यातच भर म्हणजे अनेक वेळा तांत्रिक अडचणी येत असल्याचे कारण सांगितले जाते. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (latest marathi news)
न्हावी दरवाजा परिसरात समस्या
प्रभाग एक व दोनमध्ये न्हावी दरवाजा, नारखेडे वाडा, पोलिस ठाणे परिसर, कळमोदा रोड, तहानगर, तडवी वाडा, इस्लामपुरा, खळवाळी या भागांमध्ये पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळची आहे. या दोन्ही प्रभागांची लोकसंख्या सात ते आठ हजार आहे. असे असताना या सर्व भागांमध्ये अवेळी व कमी दाबाने तसेच कमी वेळ पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांना पुरेसा व सुरळीत पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे.
"प्रभाग एक व दोनमध्ये रात्री अकरा, साडेअकराला पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पुरेसा पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घ्यावी."
- शेख साबीर शेख हसन, ज्येष्ठ नागरिक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.