जळगावातील नेहमीच समस्‍या; सिग्नल बंद.. अन्‌ वाहतूक पोलिसही गायब 

jalgaon traffic
jalgaon traffic

जळगाव : ‘अमृत’ व भुयारी गटार योजनेच्या कामामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची वाट लागल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना चौकाचौकातील बंद सिग्नल व गायब झालेल्या पोलिसांमुळे वाहतुकीच्या खोळंब्यालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांचा मनस्ताप वाढला असून योजनेचे ठेकेदार, मनपा यंत्रणा व पोलिस अशा साऱ्यांना नागरिक शिव्यांची लाखोली वाहताना दिसूताहेत. 
जळगाव शहरात गेल्या तीन अडीच- तीन वर्षांपासून अमृत योजनेचे काम सुरु असून त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते, नागरी वस्त्यांमधील रस्ते खोदून ठेवले आहेत. ना योजनेचे काम पूर्ण होत, ना रस्त्यांची दुरुस्ती, अशी सर्वत्र स्थिती आहे. भरीस भर म्हणून भुयारी गटारांचे काम सुरु झाल्याने आठ महिन्यांपासून या कामाचा त्रासही वाढला आहे. या कामामुळे तर रस्त्याच्या मधोमध चारी खोदली जात असल्याने संपूर्ण रस्त्याचीच वाट लागते. त्यामुळे या बिकट रस्त्यांवरुन वाट काढणे वाहनधारकांच्या थेट जिवावरच बेतत आहे. 

चौपदरीकरणाचाही त्रास 
शहराच्या चौफेर अमृत योजनेचे काम व शहराचे दोन भाग करणाऱ्या महामार्गावरही चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने या दोन्ही भागातून आवागमन करणारे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. चौपदरीकरणाचे कामही दीड वर्षापासून सुरु असून मुदतीत म्हणजे मार्चपर्यंत ते होणेही शक्य नाही. 

सिग्नल बंदचा मनस्ताप 
अमृत, भुयारी गटार आणि चौपदरीकरणाच्या कामाने रस्त्यांची वाट लागलेली असताना महामार्ग आणि शहरातील प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणा गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. ज्या प्रमुख चौकांमध्ये कायम सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत सिग्नल सुरु राहायचे, त्याठिकाणी गेल्या तीन-चार महिन्यांपासून ही यंत्रणा बंद आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडत वाहनधारक सर्रास वाहने दामटताना दिसतात. परिणामी, वाहतूक विस्कळीत होऊन वाहनधारकांचा मनस्ताप होतो. 

वाहतूक पोलिसही गायब 
खरेतर सिग्नल यंत्रणा सुरु असो की बंद, असताना वाहतुकीचे नियमन करणे वाहतूक पोलिस शाखेची जबाबदारी असते. मात्र, एरवी सिग्नल सुरु असताना दिसणारे पोलिस आता काही महिन्यांपासून सिग्नल बंद असतानाही चौकात दिसून येत नाहीत. चौकात उपस्थिती असली तरी ते एखादा कोपरा धरुन उभे असतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला की तो काही काळ तसाच राहतो. अशात रुग्णवाहिका अडकली तर रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. 
 
रस्ते सुरक्षा अभियान वांझोटे 
गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात येत होते. १५ फेब्रुवारीस या अभियानाचा समारोप झाला. चार हजार वाहनांवर कारवाई व १५ लाखांचा दंड वसूल, या पलीकडे अभियानाची फलनिष्पत्ती काही नाही. ना वाहतूक शाखेच्या पोलिसांना कर्तव्याची जाणीव झाली ना, वाहनधारकांना शिस्त लागली. हे अभियान पूर्णत: वांझोटे ठरल्याचे चित्र सध्याच्या वाहतूक स्थितीवरुन दिसून येते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com