जळगाव : शासनाला जमीन, जागा प्लॉटच्या दस्त नोंदणीतून (selling registration) मुद्रांक शुल्काद्वारे माठा महसूल (Revenue) मिळतो. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आता सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीस (खरेदी-विक्रीची नोंदणी) येताना प्रत्येकाला कोरोनाची ‘आरटीपीसीआर’ चाचणी (‘RTPCR’ test) करण्यास आदेश देण्यात आले आहेत. यामुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच दस्त नोंदणी कार्यालयाचे नोंदणीचे व्यवहार ठप्प होऊन, कार्यालय बंद झाले की काय? असे म्हणण्याची वेळ आली आहे. (selling registration transactions effects compulsory ‘RTPCR’ test)
शहरात तीन, तर जिल्ह्यात तालुक्याला एक, असे अठरा दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. त्यात दस्त नोंदणीचे व्यवहार होतात. त्याद्वारे लाखो रुपयांचा महसूल शासनाला मिळतो. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या १ मेसपासून सर्वच कार्यालयात दस्त नोंदणीस येणाऱ्यांना अगोदर ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करावा, नंतरच नोंदणी होईल, असे आदेश काढण्यात आले आहेत. यामुळे नोंदणी करणाऱ्या दोन्ही पक्षांना (खरेदीदार व व्रिकेत्यांना) विनाकारण चाचणीचा प्रत्येकी दोन ते अडीच हजार रुपये खर्च करावा लागत आहे. दस्त नोंदणीस साक्षीदारासह संमतीधारकांची संख्या पाच ते दहा किंवा त्यापेक्षा अधिक होते. एक दस्त नोंदणीस प्रत्येकी दोन ते अडीच हजारांचा अगोदर खर्च करावा लागतो. दोन दिवसांनी निगेटिव्ह अहवाल आला तरच दस्त नोंदणी होते. साक्षीदार, संमतीधारकांपैकी एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला तर इतरांनी केलेला खर्च वाया जातो. यामुळे खरेदीदार व विक्रेत्यांनी केवळ तोंडी सौदा करण्यावर भर दिला आहे. प्रत्यक्ष नोंदणीला तूर्त तरी नकार देत जेव्हा आरटीपीसीआर चाचणीची अट रद्द होईल तेव्हा नोंदणी करू, असा पावित्रा घेतला आहे. यामुळे दैनंदिन दस्त नोंदणीची संख्या बोटावर मोजण्या एवढी होत आहेत.
ॲन्टिजेन चाचणीला ग्राह्य धरा
दस्त नोंदणी करणाऱ्याची मागणी अशी आहे, की आरटीपीआर चाचणीचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. त्याऐवजी कोरोनाची ॲन्टिजेन चाचणीचा अहवाल ग्राह्य धरला जावा. याद्वारे चाचणीचा खर्चही वाचेल अन् खरेदीदार, विक्रेत्यांचा वेळही वाचेल.
कोविडपासून संरक्षणासाठी निर्णय
जिल्ह्यातील नागरिकांना आता दस्त नोंदणीसाठी सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी येताना ४८ तासांचे आतील आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असेल तरच दस्त नोंदणीस उपस्थित राहता येईल. हा निर्णय सर्वांच्याच आरोग्याच्या दृष्टीने हिताचा आहे. ॲन्टिजेन चाचण्याचा अहवाल केव्हा केव्हा योग्य नसतो. यामुळे ‘आरटीपीसीआर’ केल्याने ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह हे कळते. निगेटिव्ह असली की तिच्यापासून इतरांना धोका नसतो. कोविडपासून आपले तसेच इतरांचे संरक्षण होण्यासाठी हा निर्णय आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक (वर्ग-१) तथा मुद्रांक जिल्हाधिकारी विजय भालेराव यांनी दिली.
(selling registration transactions effects compulsory ‘RTPCR’ test)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.