वरणगाव : शहरातील जगदंबानगरात शिवसेनेचे पदाधिकारी विलास मुळे यांच्या घराजवळ नगरपरिषदेने प्रक्रिया केलेले पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी गेल्या दोन महिन्यांपासून फुटली असून, लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या विषयी पालिकेला सांगूनही अधिकारी डोळेझाक करीत असल्याचे श्री. मुळे यांनी सांगितले.
केंद्र व राज्य सरकारमार्फत दरवर्षी ‘पाणी आडवा पाणी जिरवा’, ‘ग्रीन वॉटर’, ‘जलयुक्त शिवार’, कोल्हापुरी बंधारे, लघु बंधारे अशा अनेक योजना टंचाई निवारणार्थ राबविल्या जातात. त्याच अनुषंगाने वरणगाव पालिकेचे मुख्याधिकारी समीर शेख यांनी देखील शहरात पाणी वाचवा, नळाला तोट्या बसवा, पाणी भरण्यासाठी मोटारचा वापर करू नका, असे पत्रक काढले होते. या पत्रकाचा कोणी भंग केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे असताना पालिकाच लाखो लिटर पाण्याची नासाडी करतेय, याला काय म्हणावे? असा नागरिकांना प्रश्न पडला आहे.
शहरातील जगदंबानगरात गेल्या दोन महिन्यांपासून प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याची जलवाहिनी फुटली असून, नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीच्या नावाखाली पाच फूट खड्डा खोदून ठेवला आहे. त्यामुळे जलवाहिनीची गळती मोठ्या प्रमाणात वाढली असून, लाखो लिटर पाण्याची नासाडी होताना दिसते आहे. अक्षरशः रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले असून, लोकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. या रस्त्यावरच कॉलनीतील लहान मुले खेळतात. त्यामुळे या खड्ड्यात लहान मुले, वयोवृद्ध पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही जलवाहिनी अवजड वाहनांनी व खड्डेमय झालेल्या रस्त्यांमुळे फुटली असल्याचे स्थानिक रहिवासी सांगत आहेत. त्यातून वाया जाणारे पाणी प्रशासनाच्या लक्षात येत नसेल का? ही शोकांतिका आहे. नगर परिषद प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करून लाखो लिटर पाण्याची बचत करावी, जेणेकरून लोकांना व्यवस्थित पाणी पुरवठा होईल आणि ये-जा करणाऱ्यांना त्रास होणार नाही. अशा प्रकारची तक्रार शिवसेनेचे विलास मुळे यांनी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.