
Jalgaon News : ‘एसपी’ निवासस्थानालगत RTO एजंटची जत्रा; वाहतुकीचा खोळंबा अन् पोलिस उदासीन
जळगाव : मागील काळात आरटीओ (RTO) कार्यालयाच्या आवारात व्यवसाय थाटून बसलेल्या एजंटमध्ये वाद उद्भवून मोठा राडा झाला होता.
तेव्हापासून एजंटांना कार्यालय आवाराबाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांनी त्यांचा डेरा थेट पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या संरक्षक भिंतीलगत टाकला आहे. (rto agent camped right next to guard wall of Superintendent of Police residence jalgaon news)
त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, वाहतुकीचा खोळंबाही होतोय. एसपींच्या निवासाला या अतिक्रमणाचा विळखा बसून वाहतुकीस अडथळा होत असल्यानंतरही पोलिस यंत्रणा मात्र उदासीन आहे.
जळगावचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नेहमीच वादाचे ठिकाण राहिले आहे. परिवहन अधिकाऱ्यांचा एजंटांशी वाद, एजंट-ग्राहकांमधील हाणामारीच्या घटना, सामाजिक कार्यकर्त्यांच्या या विभागाविषयी तक्रारी, कार्यकर्त्यांचे वाद आणि त्यातून होणाऱ्या घटना या परिवहन कार्यालयात नित्याच्याच झाल्या होत्या. एजंटांमधील वादाने मागील काळात अनेकदा या कार्यालय परिसरात तणाव निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
एजंटांना काढले बाहेर
या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी एजंटांना कार्यालयीन आवाराबाहेर काढले. अर्थात, त्याआधीही ही एजंट मंडळी आरटीओ कार्यालयाच्या संरक्षक भिंतीलगतच बसत होती.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
मात्र त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. साधारण दहा ते १२ वर्षांपूर्वी या एजंटांना पुन्हा बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. त्या वेळी या सर्व एजंटांनी समोरच असलेल्या पोलिस अधीक्षक निवासस्थानालगतच्या मोकळ्या जागेत आपला ‘डेरा’ टाकला.
निवासस्थानालगत भरते जत्रा
आता गेल्या काही वर्षांपासून एसपींच्या निवासस्थानालगत एजंटांची व पर्यायाने वाहनांसंदर्भात विविध कामांसाठी आलेल्या ग्राहकांची मोठी गर्दी जमते. अनेकदा याठिकाणी यात्राच भरल्याचे चित्र दिसते. या संरक्षक भिंतीपासून प्रत्यक्ष एसपींचे निवासस्थान दूर असले, तरी भिंतीलगत दिवसभर प्रचंड गर्दी असल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सर्व कामे ऑनलाइन, तरी हवेत एजंट!
खरेतर परिवहन विभागाने वाहनांसंदर्भात बहुतांश कामे ऑनलाइन केली आहेत. त्यासाठी प्रत्येकवेळी वाहनधारकांना आरटीओ कार्यालयात येण्याची गरज नाही. तरीही या व्यवस्थेमुळे ना एजंट कमी झाले, ना त्यांचा प्रभाव. शिवाय आरटीओ विभागातील गैरव्यवहार नियंत्रणात आले असले तरी ते बंद झालेले नाही.
रस्त्यावर अडथळा चुकीचा
या एजंटांनी व्यवसाय करावा, कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यावर चालवावा याबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, काव्यरत्नावली चौकापासून थेट आरटीओ कार्यालयासमोरील मार्गावर एजंट व ग्राहकांच्या मोठ्या गर्दीने अनेकदा वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. हा प्रकार थांबणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानालगत वाहतूक खोळंबत असताना, वाहतूक पोलिस शाखा मात्र याठिकाणी कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही.