धुळे/कापडणे : धनूर (ता. धुळे) येथे ग्रामपंचायत कार्यालयालगत विनापरवानगी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा दोन दिवसांत हटविण्याचा अल्टिमेटम जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सोमवारी (ता. २१) दिला. तसेच वाद निर्माण होण्यास कारणीभूत सरपंचांवर अपात्रतेची कारवाई करावी, तसेच ग्रामसेवक व पोलिस पाटलाला निलंबित करण्याचा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे.
राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर व सन्मान आहे. मात्र, धनूर येथे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मंजुरी न घेता पुतळा उभारला. विनापरवानगी धनूर ग्रामपंचायतीलगत रातोरात पुतळा उभारला. या ग्रामपंचायतीच्या जागेत पुतळा उभारला जाईल, असे क्राँक्रीटचे फाउंडेशन पूर्वीच तयार होते. असे अनधिकृत बांधकाम ग्रामपंचायतीने का खपवून घेतले. या प्रकरणी कायदेशीर कारवाई का केली गेली नाही, असे प्रश्न उपस्थित करत महसूल प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा आदर केला जावा, अशी भूमिका घेतली आहे. त्यानुसार सरपंच सत्यभामाबाई शिंदे यांना अपात्र ठरविण्याचा, तर ग्रामसेविका सुरेखा ढोले व पोलिस पाटील संदेश पाटील यांना निलंबित करण्याचा आदेश जिल्हा परिषद प्रशासनास दिला आहे, असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी ‘सकाळ’ ला सांगितले. तसेच विनापरवानगीमुळे बुधवारपर्यंत (ता. २३) हा पुतळा पावित्र्य राखत काढावा, असा अल्टिमेटमही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
महसूल यंत्रणेकडून नोटीस
पुतळा काढताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अन्यथा, कारवाईच्या इशाऱ्याची नोटीस धनूरच्या सरपंच शिंदे, ग्रामसेविका ढोले यांना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बजावली आहे. त्यामुळे घडामोडींकडे जिल्ह्याचे लक्ष असेल. धनूर येथे शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ग्रामपंचायतीलगत अश्वारूढ छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा अज्ञातांनी उभारला. तो विनापरवानगी असल्यामुळे महसूल, पोलिस प्रशासन व ग्रामस्थांमध्ये तीन दिवसांपासून चर्चा सुरू होती. धनूरमधील महिलांसह अन्य ग्रामस्थांनी पुतळा हटवू नये, यासाठी पुतळ्याभोवती वेढा घालत ठिय्या आंदोलन केले. शिवजयंतीच्या रात्री ग्रामस्थांनी सामूहिक भोजन करीत रात्रभर पुतळ्याचे संरक्षणही केले. यात रविवारी पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर आमदार कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून तोडगा काढू, अशी भूमिका घेत ठिय्या मागे घेण्याचे आवाहन केले. त्यामुळे ग्रामस्थ माघारी हटले. खासदार डॉ. सुभाष भामरे यांनीही ग्रामस्थांची भावना समजून घेतली.
बैठक आणि जमावबंदी
असे असताना पोलिस प्रशासनाने धनूर येथे जमावबंदीचा आदेश जारी केला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हाधिकारी शर्मा यांची खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार कुणाल पाटील यांनी भेट घेतली. सरपंच सत्यभामाबाई शिंदे, उपसरपंच माधुरी पाटील व तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. अधिकारी व लोकप्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील यांनी सांगितले. त्यात प्रांताधिकारी धोडमिसे यांनी सायंकाळी पुतळा काढून घेण्याबाबत ग्रामपंचायतीला नोटीस बजावली.
धनूरला आज ग्रामसभा
पुतळा प्रकरणी धनूर येथे मंगळवारी (ता. २२) विशेष ग्रामसभा होत आहे. सभेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती स्थापन होणार आहे. समिती पुतळ्याचे संरक्षण व पावित्र्य राखण्यासंदर्भात जबाबदारी स्वीकारणार आहे. तसेच पुतळ्यासंदर्भात ग्रामस्थ अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती उपसरपंचांचे प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.