
Jalgaon News : बांबू टाकून अपघात रोखण्याचा प्रयत्न; महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर ‘जीवघेणा खड्डा’!
जळगाव : जळगावकरांना चांगले रस्ते देण्याची हमी महापालिकेची आहे. मात्र, आज त्या कर्तव्यापासून ती दूर गेली आहे. याचा पुरावा म्हणजे महापालिकेचे कार्यालय असलेल्या सतरा मजली इमारतीपासून अगदी हाकेच्या अंतरावर बांधण्यात आलेल्या गटारीवरचा ढापा तुटला आहे.
त्या ठिकाणी खड्डा पडला आहे. भररस्त्यावर असलेल्या या खड्ड्यामुळे अपघात होऊन एखाद्याचा जीव जाऊ नये, म्हणून कोणीतरी दयाळू व्यक्तीने त्या खड्ड्यात मोठा बांबू टाकून सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.
मात्र, याच रस्त्यावरून महापालिकेचे अधिकारी, पदाधिकाऱ्यांसह सर्वच जातात. मात्र, एकलाही तो खड्डा अद्याप दिसलेला नाही. सर्वांचेच डोळे रस्त्यावरून चालताना झाकलेले असतात काय, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.
या ठिकाणी अपघात झाल्यानंतरच लोक जागे होणार काय, असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित होत आहे. (Trying to prevent accidents by throwing bamboo Deadly pit at distance from municipal corporation Jalgaon News)
जळगाव शहरात रस्ते व गटारींची अनेक कामे प्रलंबित आहेत. काही ठिकाणी कामे झाली. मात्र, ती अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. याबाबत महासभेतही आवाज उठविण्यात आला आहे. ही कामे तपासण्यासाठी आता समिती नियुक्त करण्यात आली आहे.
ही समिती स्थापन होईल तेव्हा होईल; परंतु याच निकृष्ट कामाचा धडधडीत पुरावा महापालिकेच्या सतरा मजली इमारतीच्या अगदी जवळच भररस्त्यावर दिसून येत आहे.
गटारीवरचा ढापा तुटला
महापालिकेच्या सतरा मजली इमारतीजवळील शीतल कलेक्शनच्या बाजूला असलेल्या चौकातील भररस्त्यावर हा खड्डा पडला आहे. या रस्त्यावर मोठी रहदारी आहे. त्यामुळे हा खड्डा अत्यंत धोकादायक आहे.
तो वाहनधारकांना कळावा, म्हणून त्या ठिकाणी कुणीतरी खड्ड्यात बांबू रोवून सावधगिरीचा इशारा दिला आहे. या खड्ड्याची माहिती घेतली असता, महापालिकेतर्फे या ठिकाणी गटारीचे काम करण्यात आले होते. मात्र, ते अत्यंत निकृष्ट झाल्याने त्या ठिकाणचा ढापा तुटला आहे. त्यामुळे हा खड्डा पडला आहे.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
महापालिकेचे अधिकारी लक्ष देतील काय?
सतरा मजली इमारतीजवळच हा खड्डा पडलेला असल्यामुळे अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हा खड्डा तातडीने दुरुस्त करण्याची गरज होती. मात्र, महापालिकेचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे अद्यापही त्याकडे लक्ष गेलेले नाही.
रात्री हा खड्डा दिसत नाही. त्यामुळे एखादा अपघात होण्यापूर्वी हा खड्डा दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.