मानेवर फावड्याचा जोराचा फटका बसताच तो खाडीपात्रात कोसळला अन् गावात एकच खळबळ 

 worker in a sand dispute crime sindhudurg marathi
 worker in a sand dispute crime sindhudurg marathi

मालवण (सिंधुदुर्ग) : कर्ली खाडीपात्रात सुरू असलेल्या वाळू उपसा वादाला आज हिंसक वळण लागले. देवली येथे खाडीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या परप्रांतीय कामगारांवर हल्ल्याचा प्रकार घडला. यात एकाचा मृत्यू तर अन्य एक जखमी झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार दुपारी बाराच्या दरम्यान घडला. 

या हल्ल्यात सकलदीप मनबहाल सिंह (वय 48, रा. झारखंड) कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी सकलदीप उसा सिंह याने येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तात्या ऊर्फ भिकाजी पवार (38, रा. चिपी-कालवंड, ता. वेंगुर्ले) व राकेश रघुनाथ गावडे (25, रा. डिकवल, ता. मालवण) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. दोघांनी संगनमत करून प्राणघातक हल्ला करत ठार मारल्याचे त्यात म्हटले आहे. संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे. 

कर्ली खाडीत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा चालतो. यात काही अधिकृत वाळू पट्‌टेही आहेत. काही वेळा अधिकृत वाळू पट्‌टे सोडून इतर प्रतिबंधीत भागात उपशाचे प्रकारही घडतात. यातून स्थानिकांशी वाद होतात. या पार्श्‍वभूमीवर देवली येथील सुरेश नारायण नाईक यांच्या मालकीच्या बोटीवर देवली-चिपी (कालवंड) खाडीपात्रात डेंटरधारक मालकाकडील परप्रांतीय कामगार सकलदीप मनबहाल सिंह (38), यमुना मनबहाल सिंह (53), पकलू लोभसिंह (41), सकलदीप उसा सिंह (26) वाळूपट्ट्यात वाळू उपसा करत होते. त्यावेळी देवली किनाऱ्याहून छोट्या होडीच्या साहाय्याने तात्या पवार व राकेश गावडे वाळू उपसा होत असलेल्या होडीवर आले.

 "तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून वाळू काढता? असे म्हणत शिवीगाळ करत लाकडी दांडा, कोयता आणि बोटीतील फावडे याने कामगारांना मारहाण करण्यास सुरवात केली. या हल्ल्यात सकलदीप मनबहाल सिंह या कामगाराच्या मानेवर फावड्याचा जोराचा फटका बसताच तो खाडीपात्रात कोसळला. अन्य तीन कामगारांनी सकलदीपला पाण्याबाहेर काढले; मात्र त्याची काहीच हालचाल होत नव्हती. त्याला किनाऱ्यावर आणले. त्यानंतर मालक सुरेश नाईक यांनी खासगी गाडीतून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच सकलदीपचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. हल्ल्यात सकलदीप याचा भाऊ यमुनाही जखमी झाला. हल्लेखोराना स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंखे येथे दाखल झाल्या होत्या. पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर तपास करत आहेत. 

काय आहे वाद? 
कर्ली खाडीपात्रातील वाळू पट्ट्यांचा काही दिवसांपूर्वी लिलाव झाला आणि वाळू उपशाला सुरवात झाली. यात वाळू व्यावसायिकांकडून प्रतिबंधित क्षेत्रात वाळू उपसा केला जात असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांनी केल्या होत्या. यात तारकर्ली पुलाच्या सहाशे मीटरच्या परिसरात वाळू उपशाला बंदी असतानाही त्याचे वाळू व्यावसायिकांकडून उल्लंघन केले जात होते. त्यामुळे या भागातील खार बंधारा व माड बागायतींना धोका निर्माण झाला होता. या प्रकरणी स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यात सातत्याने लक्ष वेधत कारवाई करण्याची मागणी केली होती; मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यानेच ग्रामस्थांना आक्रमक भूमिका घ्यावी लागली. यातूनच आजचा प्रकार घडला. याला जिल्हा प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. 

परप्रांतीय कामगारांमध्ये भीती 
वाळू उपसा करणाऱ्या कामगारांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच देवली गावात एकच खळबळ उडाली. वाळू पट्ट्यांचे अधिकृत लिलाव झाल्यानंतर अनेक निविदाधारकांनी परप्रांतीय कामगारांना वाळू उपसा करण्यासाठी येथे आणले आहेत. रोजीरोटी मिळण्याच्या आशेने कामगार वाळू उपशाचे काम करतात; मात्र आज झालेल्या घटनेत एका कामगाराला आपला प्राण गमवावा लागला. त्यामुळे कामगार बिथरून गेले आहेत. त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. कामगारांनी काम थांबविल्यास लाखो रुपये भरून अधिकृत निविदा घेतलेल्या व्यावसायिकांचा व्यवसायही धोक्‍यात येण्याची चिन्हे आहेत. 

संपादन- अर्चना बनगे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com