रत्नागिरी : दुमजली इमारतीच्या गच्चीवर दीड गुंठ्यात निवृत्त शिक्षक दिगंबर व सुलभा साठे या दांपत्याने वेलवर्गीय शेती पिकवली आहे. पंधरा भोपळे, सुमारे दहा किलो कारली आणि तीसहून अधिक काकड्या पिकवल्या आहेत. पालेभाजी, अंबाडीचे चांगले उत्पादन घेतले आहे. यातील एका भोपळ्याचे वजन साडेसात किलो तर मोठी काकडीचे (तवस) वजन चार किलो आहे.
गच्चीचे आकारमान ४० फूट बाय २० फूट आहे. येथे गेल्या दहा वर्षांपासून साठे भातशेतीसह पडवळ, भेंडी, दोडके, पालेभाजी, तोंडली, दुधीभोपळे, वांगी, मिरच्या असे विविधांगी उत्पादन घेत आहेत. मुळचे खंडाळा येथील साठे यांनी निवृत्तीनंतर जोशी पाळंदमध्ये स्वतःचे दुमजली घर बांधले, विहीर खोदली. दहा वर्षांपूर्वी त्यांनी गच्चीमध्ये भाजीपाला करायचे ठरवले. त्याला यश आले.
हेही वाचा - आंबोलीत पावसाचा मुड बदलतोय
सुरवातीला गच्चीवर नारळाची सोडणे, झावळ्या, करवंट्या, प्लास्टिक वगळून घरातील कचरा व थोडी माती वापरून मशागत केली. जवळच्या रस्त्यांवरून मोकाट गुरांचे शेणही आणून वापरले. पडवळ, भेंडी, चिबूड, पावटा अशी हंगामी पिके घेतली. कोरोना लॉकडाउनमुळे यंदा साठे गावी गेले व जूनमध्ये परतले. पाऊस थोडा उशिरा सुरू झाल्याने भाजावळ केली. आवारात पडलेली पाने, त्यातीलच गवत बारीक करून मातीत मिसळले. सेंद्रिय खत वापरले. आता तोंडलीचा वेल करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
गच्चीत जाळी बसवली तर वानरांचा त्रास होणार नाही. भाजीवर पेंगळ व किरकोळ किडींचा प्रादुर्भाव झाला. पण मुंग्यांच्या पावडरीने उपयोग झाल्याचे त्यांनी सांगितले. गच्चीत राखणीला बसण्यासाठी साठे यांनी पर्णकुटीही बांधली. ते दररोज सकाळी दीड-दोन तास शेतीसाठी देतात. या कामात त्यांना त्यांचा नातू चिन्मय, सून, मुलाचीही मदत होते.
"वर्षभरात चार ते सहा माणसांना पुरेल एवढा भाजीपाला आम्ही गच्चीत पिकवतो. बाहेरून भाजी आणायला लागत नाही. बाहेरून भाजी आणण्यापेक्षा आम्ही दहा वर्षे बहुतांशी ‘आत्मनिर्भर’ झालो आहोत."
- दिगंबर साठे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.