राजापूर तालुक्यात 'या' गावांच्या मे मध्ये निवडणूका 

51 Gram Panchayat Election In May Ratnagiri Marathi News
51 Gram Panchayat Election In May Ratnagiri Marathi News

राजापूर ( रत्नागिरी ) - ग्रामीण भागावरील राजकीय वर्चस्व अधोरेखित करणाऱ्या तालुक्‍यातील 51 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूका मे महिन्यामध्ये रंगणार आहेत. या निवडणुकांमध्ये पूर्वीप्रमाणे सरपंच थेट लोकांमधून निवडला जाण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे लोकांमधून थेट सरपंच होण्याची मनिषा बाळगलेल्या इच्छुकांच्या आकांक्षावर पाणी फेरले जाणार आहे. मात्र, निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे महत्व वाढणार आहे. 

तालुक्‍यातील 51 ग्रामपंचायतींच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांची मुदत मे ते जुलै दरम्यान संपणार आहे. त्या ग्रामपंचायतींच्या मेमध्ये निवडणुका रंगणार आहेत. यामध्ये शिळ, धोपेश्‍वर, गोवळ, उन्हाळे, गोठणे दोनिवडे, चिखलगाव, कोदवली, ओणी, कोडीवळे, मंदरूळ, चुनाकोळवण, पन्हळेतर्फे सौंदळ, तळगांव, मोसम, पांगरे बु. ससाळे, दोनिवडे, कारवली, हरळ, रायपाटण, करक, पांगरीखुर्द, येरडव, कार्जिडा, कोळंब, मिळंद, जवळेथर, हातदे, मोरोशी, सौंदळ, ताम्हाणे, तुळसवडे, फुपेरे, परटवली, ओशिवळे, आडवली, आंबोळगड, सोलगांव, शिवणेखुर्द, वाडापेठ, कशेळी, कोंडसर बु., कुंभवडे, पडवे, महाळुंगे, तारळ, वाल्ये, अणसुरे, कुवेशी, दळे, निवेली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सरपंचांची थेट निवड करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. मात्र, राज्यामध्ये सत्तांतर होऊन आलेल्या महाशिव आघाडीने थेट सरपंच निवड करण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द केला आहे. त्याचे परिपत्रक अद्यापही स्थानिक प्रशासनाकडे आलेले नाही. त्यामुळे प्रशासनाकडून या निर्णयाला थेट दुजोरा दिला जात नाही. असे असले तरी, या वेळी थेट लोकांमधून सरपंच निवड होणार नसल्याचे बोलले जात आहे. थेट जनतेमधून सरपंच निवड रद्द झाल्याने थेट लोकांमधून निवडून येण्यास इच्छुक असलेल्यांच्या इच्छा-आकांक्षेवर पाणी फेरले गेले आहे. त्याच्यातून काहीजण माघार घेण्याच्या तयारीमध्ये असल्याचे चित्र आहे. त्याचा ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीच्या होण्यावर कोणताही परिणाम होण्याची शक्‍यता नाही. 

दृष्टिक्षेपात राजापूर 

एकूण ग्रामपंचायती ः 101 
निवडणुका होणाऱ्या ः 51 
प्रभाग ः 156 
जागा ः 399 

आरक्षण सोडतीकडे साऱ्यांचे लक्ष 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महसूल विभागाकडून प्रभाग रचना तयार केली जात असून ही प्रभाग रचना अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. प्रशासनाने तयार केलेल्या प्रभाग रचनेवर हरकती दाखल करणे आणि त्यावर निर्णय घेऊन त्याला अंतिम मूर्त स्वरूप दिले जाणार आहे. त्याचवेळी, प्रभागनिहाय आरक्षण सोडतही होणार आहे. त्यामुळे प्रभाग रचनेसह प्रभागाच्या आरक्षण सोडतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com