पुरग्रस्तांनो, मदतीसाठी शिवसैनिकांना सांगा, ते नक्की धावून येतील

पुरग्रस्तांनो, मदतीसाठी शिवसैनिकांना सांगा, ते नक्की धावून येतील

बांदा - कोकणासह राज्यात यावर्षी पूरस्थिती उद्‌भवल्याने मोठी नैसर्गिक आपत्ती आली आहे. त्यामुळे नुकसानभरपाई देताना कोणावरही अन्याय होणार नाही, यासाठी शिवसेना सातत्याने प्रयत्न करेल. पूरग्रस्तांना पुन्हा भक्‍कमपणे उभे करू. काही मदत हवी असल्यास शिवसैनिकांना सांगा, ते नक्की तुमच्यासाठी धावून येतील, असा विश्‍वास युवासेना प्रमुख, युवा नेते आदित्य ठाकरे यांनी येथील पूरग्रस्तांना दिला. 

श्री. ठाकरे यांनी आज जिल्ह्यात पूरग्रस्त भागाचा दौरा केला. झोळंबे, सरमळे आदी गावांना त्यांनी भेट दिली. बांदा येथे विठ्ठल-रखुमाई मंगल कार्यालयात पूरग्रस्तांशी संवाद साधला व त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

या वेळी पालकमंत्री तथा राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार सचिन अहिर, जान्हवी सावंत, विक्रांत सावंत, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, सरपंच मंदार कल्याणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

श्री. ठाकरे यांनी लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी मी येथे आलो आहे. आपल्या समस्या काय आहेत, हे उपस्थितांनी मांडाव्यात, असे आवाहन केले. व्यापाऱ्यांनी ठाकरे यांच्यासमोर समस्या मांडल्या.

यानंतर श्री. ठाकरे म्हणाले, ""राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पुरामुळे संकट आले आहे. त्यामुळे मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची काळजी शिवसेना घेईल. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. पूरबाधितांच्या पाठीशी शिवसैनिक आणि शिवसेना ठामपणे उभी राहील. ही नैसर्गिक आपत्ती असल्याने सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. विमा कंपन्यांना विम्याची रक्कम नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मिळण्यासाठी मी कंपनीच्या वरिष्ठांशी मुंबईत बैठक घेईन. येथील समस्यांबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येईल.'' 

ठाकरे यांनी बांदा गांधी चौक बाजारपेठेत पायी जात व्यापाऱ्यांची विचारपूस केली. तत्पूर्वी त्यांनी श्री. बांदेश्वराचे दर्शन घेतले. मंदार कल्याणकर यांनी पूरबाधितांच्या व्यथा मांडल्या. यावेळी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शासन सर्वतोपरी पूरग्रस्तांच्या पाठीशी 
पूरबाधितांच्या शासन सर्वतोपरी पाठीशी आहे. घरांबरोबरच व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी शासनाने 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय अध्यादेश निघाल्यानंतर तातडीने मदतीची रक्कम खात्यात वर्ग होईल. केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांच्या माध्यमातून गृहपयोगी साहित्य वाटप झाले. जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेला साडेचार कोटी रुपये निधी दिल आहे. रस्ते दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनमधून आठ कोटींचा निधी मंजूर केला आहे. केळी लागवडीसाठी 1 लाख 10 हजार रुपये व शेती नुकसानग्रस्तांना देखील भरपाई देण्यासाठी निधी मंजूर केला आहे. पूरग्रस्तांना तातडीची दहा हजार रुपयांची मदत देण्यासाठी दोन कोटी दिले आहेत. शासन तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची ग्वाही पालकमंत्री केसरकर यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com