कोकण : कुडाळ आठ दिवसात रस्ता दुरुस्ती सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपतर्फे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी आज दिला. तालुक्यातील कुडाळ-मालवण, कुडाळ-पाट व अन्य सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याचा जाब विचारण्याकरिता भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी उपस्थित शाखा अभियंता पाटील यांना धारेवर धरत पुढील आठ दिवसात ही कामे सुरू करण्यात आली नाहीत तर उग्र आंदोलन छेडण्यात येणार आहे, असा इशारा देण्यात आला.
आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी हे रस्ते सुस्थितीत होतील, असे आश्वासन दिले होते; मात्र या कामाची अद्यापपर्यंत वर्क ऑर्डर देखील झालेली नाही. उद्घाटनाच्या आदल्या दिवशी त्या रस्त्यावर करण्यात आलेले काम हे केवळ एक दिवसाचे नाटक होते, असा आरोप करून हे काम देखील आमदारांनी आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना करायला भाग पाडले होते, असे श्री. देसाई यांनी सांगितले. त्याचबरोबर ज्या कामाची वर्कऑर्डर झालेली नाही ते काम सुरू कसे करण्यात आले? असा सवाल त्यांनी केला. इस्टिमेटप्रमाणे काम न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना होणार्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असे देखील त्यांनी सांगितले.
कुडाळ-मालवण रस्त्यावर देखील कार्यारंभ आदेश नसताना संबंधित ठेकेदाराला एक वर्ष अगोदर आगाऊ काम करायला लावण्यात आले होते; मात्र आता भारतीय जनता पार्टीची एक विशेष टीम या सर्व कामावर देखरेख करणार आहे. कामाचा दर्जा, इस्टिमेटप्रमाणे काम होते की नाही, तसेच काम सुरू असताना या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व अधिकारी हजर असतात की नाही यावर देखील लक्ष ठेवण्यात येणार आहे. या सर्व गोष्टींचे व्हिडिओ शूटिंग देखील करून गरज पडल्यास त्या सर्व संबंधितां विरोधात न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे, असे देखील श्री. देसाई यांनी सांगितले.
लोकांनी आंदोलनाची नोटीस दिली की लगेच या रस्त्यावर किरकोळ काम करण्याचे नाटक करण्यात येते आणि आंदोलनकर्त्यांना पोलिसी बळाचा वापर करून नोटीस पाठवण्यात येतात; मात्र यापुढे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे तालुकाध्यक्ष विनायक राणे यांनी सांगितले. पिंगुळी-पाट रस्त्यावर हुमरमळा गावात जे काम करण्यात आलेले आहे ते पूर्णपणे दर्जाहीन असून या कामाची तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील माजी सभापती संजय वेंगुर्लेकर यांनी केली आहे. आमदार नाईक यांनी गेल्या सात वर्षात लोकांना केवळ खोटी आश्वासने देण्याव्यतिरिक्त काही केलेले नाही. त्यामुळे दसऱ्यापूर्वी हे रस्ते सुस्थितीत होणार असे म्हणणारे आमदार नाईक यांनी निदान दिवाळीपर्यंत तरी या रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी, असे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रूपेश कानडे यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.