सिंधुदुर्ग किल्ला हा आमच्या अस्मितेची बाब आहे. भारतीय आरमाराचा पाया आहे.
सिंधुदुर्गनगरी : ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याची (Sindhudurg Fort) देखभाल दुरुस्ती करावी, यासह विविध समस्यांकडे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत (Brigadier Sudhir Sawant) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदी यांना दिलेल्या पत्रात ब्रिगेडियर सावंत यांनी म्हटले आहे की, ''छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या हस्ते अनावरण करण्यात येत आहे. याचा आम्हाला आनंद होत आहे. त्यानिमित्ताने कोकणाच्या विकासाचे विविध प्रमुख मुद्दे मांडत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेवर आल्यावर प्रचंड परिश्रम करून विकासाचा गाडा पुढे नेला आहे. तरी काही मुद्दे आहेत जे आपणच करू शकता. त्यातील पहिला मुद्दा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला सिंधुदुर्ग किल्ला. मी स्वतः अनेकदा एएसआयकडे विनंती करत राहिलो आहे. त्याची देखभाल आणि दुरुस्ती व्यवस्थित व्हावी. अनेक वर्ष प्रयत्न करून देखील केंद्राचे त्याच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. तरी या बाबतीत आपण स्वतः जातीने लक्ष घालून सिंधुदुर्ग किल्ल्याची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचा आदेश द्यावा. त्यासाठी लागेल तो निधी द्यावा.
किनारपट्टीचे संरक्षण करण्यात यावे. खाडी व समुद्राच्या प्रचंड धूप होत आहे. त्यामुळे किनारपट्टी उद्ध्वस्त होऊ शकते. आता झालेला जागतिक संमेलनात जगातील सर्व किनारपट्टी धोक्यात आहेत, अशी मांडणी करण्यात आली. त्याप्रमाणे सर्वात जास्त प्राथमिकता देऊन सर्व किनारपट्टीच्या संरक्षण करण्यासाठी आधुनिक बंधारे बांधावे व खाडीतला गाळ काढण्यात यावा.''
पत्रकात पुढे म्हटले आहे की, ''सिंधुदुर्गमध्ये पर्यटन आणि मत्स्यवसाय उद्योगाला तसेच फळ प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि बाजारपेठ मिळवून द्यावी. मच्छीमारीसाठी लागणारे सोयी सुविधा जेटी व बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर किनारपट्टीवरील गावांमध्ये पर्यटन आणि जलक्रीडा या व्यवसायांना मदत करावी. चार वर्षांपूर्वी आम्ही आपल्याला भेटून नैसर्गिक शेती करण्याबद्दल विनंती केली होती.
ती आपण मंजूर केली आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळू लागले आहे. तरी कृषी खात्यातर्फे देशातील सर्व केवीकेना आदेश देण्यात यावा, की शेतीचे परिवर्तन नैसर्गिक शेतीमध्ये करावे व त्यासाठी निधी आणि तंत्रज्ञान पुरवण्यात यावे.'' आपण लक्ष घालून जिल्ह्यातील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी बिग्रेडियर सावंत यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शेतकऱ्यांना सर्वात जास्त त्रास रानटी जनावरांकडून होत आहे. पण, त्याबाबतीत सरकार उदासीन आहे. आता अशी परिस्थिती आली आहे की जंगलाजवळ असणाऱ्या शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. तरी शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आपण एक कृतीदल बनवावे व रानटी जनावरांचा उपद्रव नष्ट करण्यात यावा. त्यासाठी आम्ही सुचवल्याप्रमाणे उपाययोजना करण्यात यावी, अशीही मागणी बिग्रेडियर सावंत यांनी पत्रकातून केली आहे.
सिंधुदुर्ग किल्ला हा आमच्या अस्मितेची बाब आहे. भारतीय आरमाराचा पाया आहे. शिक्षणातील इतिहासाच्या अभ्यासक्रमामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज व मराठ्यांचा इतिहासाला नगण्य करण्यात आले आहे. तरी एनसीआरटीमध्ये या इतिहासाच्या अभ्यासक्रमाला प्राधान्य देण्यात यावे. त्याचबरोबर संभाजी महाराज, राजाराम महाराज व ताराराणी यांचा इतिहास जवळजवळ शालेय पुस्तकातून नाहीसा केला आहे. तरी ह्या सर्व इतिहासाला योग्य महत्त्व देण्यात यावे, असेही बिग्रेडियर सावंत यांनी पत्रकात म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.