चिपळूण (रत्नागिरी) : लोटेतील कारखानदारांना पाणी पुरवण्यासाठी वाशिष्ठी नदीवर बंधारा बांधल्यास पावसाळ्यात चिपळूण शहरात दरवर्षी 2005 सारखी पूरपरिस्थिती निर्माण होईल. अशी भीती नगरसेवक शशिकांत मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. त्यामुळे वाशिष्ठी नदीवरील बंधारा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान , एमआयडीसी उपअभियंत्यानी हा आक्षेप खोडून काढला आहे.
हेही वाचा - कर्जमाफीबाबत शेतकरी म्हणाले ....
2005 सारखी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता
लोटेतील कारखानदारांना एमआयडीसी वाशिष्ठी नदीतील पाणी पुरवते . त्यासाठी वालोपे येथे जॅकवेल उभारण्यात आली आहे . एमआयडीसीकडून वाशिष्ठी नदीतील 23 एमएलडी पाणी उचलले जाते. उन्हाळ्यात वाशिष्ठी नदीतील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे चिपळूण शहरासह वाशिष्ठी नदीवर अवलंबून असलेल्या कारखानदारांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यावर उपायोजना म्हणून वाशिष्ठी नदीवर बंधारा बांधण्याचा प्रस्ताव उद्योजक संघटनेकडून देण्यात आला होता. एमआयडीसीकडून त्याला मंजुरीही मिळाली आहे. मात्र, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असलेले शशिकांत मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून वाशिष्ठी नदीवर बंधारा बांधल्यास चिपळूण शहरात दरवर्षी 2005 सारखी परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.
क्लिक करा - गुरुजींची नोकरी नऊ जणांनी का नाकारली ...
पर्याय शोधण्यास सुरवात
2005 पर्यंत शहरात दरवर्षी पावसाचे पाणी भरायचे. वाशिष्ठी नदीतील पाणी शहरात शिरल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण व्हायची. खेर्डीची बाजारपेठही पाण्याखाली असायची. त्यावर उपायोजना म्हणून खेर्डी ते पेठमाप दरम्यान नदीतील गाळ काढण्यात आला. वाशिष्ठी नदीत पेठमाप येथे असलेला जुना फरशी पूल तोडल्यानंतर चिपळुणातील पुराची तीव्रता कमी झाली. वाशिष्ठी नदीवर बंधारा बांधून पाणी अडविल्यास त्याचा परिणाम पावसाळ्यात होईल, अशी भीती मोदींनी यांनी व्यक्त केली आहे. नगरसेवक शशिकांत मोदी यांनी दिलेल्या पत्राची दखल घेवून एमआयडीसीने पर्याय शोधण्यास सुरवात केली आहे. चिपळूण किंवा खेड तालुक्यातील नजीकच्या धरणातून पाणी पुरवठा करणे शक्य होईल का, याची चाचपणी एमआयडीसीकडून सुरू आहे.
बंधाऱ्याची उंची समुद्र सपाटीपासून कमी
वाशिष्ठी नदीवर बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याची उंची समुद्र सपाटीपासून कमी असेल. उन्हाळ्यात पाणी अडविण्यासाठी फळ्यांचा वापर केला जाईल. पावसाळ्यात फळ्या काढल्या जातील. त्यामुळे बंधाऱ्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही.
-ए. बी. पाटील, उपअभियंता एमआयडीसी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.