अखेर तोडगा निघाला; कोरोना मृतांचे अंत्यसंस्कार रत्नागिरीतच होणार
रत्नागिरी - कोरोना बाधित मृतांवर रत्नागिरीत अंत्यसंस्कार करण्याला होणार्या विरोधामुळे वातावरण गढूळ होत होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे अत्यसंस्काराचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोरोनामुळे बदलेल्या मानसिकतेतून मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत होत्या. गेले आठ दिवस हा विषय चांगलाच चर्चेत होता आला होता. यावर ‘सकाळ’ने प्रकाश टाकला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी आणि आरोग्य सभापती राजन शेट्ये यांच्यासमवेत मंत्री सामंत यांनी बैठक घेतली. त्यामध्ये महत्त्वाची चर्चा झाली.
कोरोनाचे बाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही मृतांच्या आकड्यातही भर पडत आहे. मागील काही दिवसात कोरोना बाधित रुग्ण मृत्युमुखी पडल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण होत होता. शहरात विरोध आणि स्थानिक गावातदेखील विरोध अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मृत व्यक्तींचे मृतदेह अनेक तास ताटकळत ठेवावे लागत होते. शासनाच्या निर्देशानुसार यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून तोडगा काढला जावा अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली. मंत्री आणि नगराध्यक्ष यांच्या बैठकीत कोरोना बाधित मृतांचे अंत्यसंस्कार शासकीय नियमांप्रमाणे रत्नागिरी येथील स्मशानभूमीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी याठिकाणी काही वेगळी रचना करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरतील चर्मालय येथील स्मशानभूमीचा उपयोग केला जाणार आहे. या निर्णयामुळे कोरोना बाधित रुग्णांवरील अंत्यसंस्कारावरुन निर्माण झालेल्या वादावर पडदा पडला आहे.
धुरातून व राखेतून कोणताही संसर्ग होत नाही
कोरोना बधितांचे अंत्यसंस्कार केल्यामुळे त्याच्या धुरातून व राखेतून कोणताही संसर्ग होत नाही असेही वैद्यकीय अधिकार्यांचे मत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हा संपर्कातून होतो. त्यामुळे बाधितांशी संपर्क टाळणे हा एकमेव उपाय असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.