कातळ खोदशिल्पे जागतिक वारसा व्हावीत

कातळ खोदशिल्पे जागतिक वारसा व्हावीत

रत्नागिरी - कोकणात आढळलेली वैशिष्ट्यपूर्ण कातळ खोदशिल्पे जागतिक वारसा म्हणून जतन व्हावीत, या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञांची परिषद २५ डिसेंबर रोजी पुरातत्त्व विभाग व निसर्गयात्री संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत होणार आहे.

कातळ खोदशिल्पांचा सर्वांगाने अभ्यास केलेले तज्ज्ञ परिषदेमध्ये मते मांडणार आहेत. ही शिल्पे कोकणचा अप्रकाशित इतिहास उलगडतील. यातली निवडक शिल्पे जागतिक वारसा होण्याकरिता प्रयत्न केले जाणार आहेत. २३ ते २७ डिसेंबर या कालावधीत परिषद बोलावली आहे.

निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड व पुरातत्त्व विभागाचे ऋत्विज आपटे यांनी यासंदर्भात माहिती दिली. ही शिल्पे मेसोलिथिक युगाच्या सुरवातीस मेगालिथिक संस्कृतींच्या कालखंडातील म्हणजे सुमारे दहा हजार ते दोन हजार वर्षांपूर्वींची असावीत. पुढील अभ्यासांसाठी, संपूर्ण भारतातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ या साइटला भेट देणार आहेत. येथे भेट देणारे प्रतिनिधी विविध घटकांवर प्रकाश टाकतील. ज्यामुळे प्रागैतिहासिक मानवाबद्दल अधिक माहिती उघड होणार आहे.

चर्चासत्रात डॉ. रोहिणी पांडे या जागतिक वारसास्थळे व त्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत, याची सविस्तर माहिती देणार आहेत. पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे मार्गदर्शन करणार आहेत. २५ रोजी अल्पबचत सभागृहात दिवसभर चर्चासत्र होईल.

विविध विषयांवर व्याख्याने
सुधीर रिसबूड व धनंजय मराठे हे खोदशिल्पांचा शोध, डॉ. पार्थ चव्हाण कातळशिल्पांचा जागतिक इतिहास, प्रा. सुषमा देव प्रागैतिहासिक कोकण व भू पुरातत्त्वशास्त्र, डॉ. ठाकूरदेसाई कोकणातील जांभा व कातळाची निर्मिती, प्रा. एस. एन. राजगुरू, प्रा. पी. पी. जोगळेकर, डॉ. अल्पना वाटवे कोकणाची जैवविविधता व पर्यावरण यावर मार्गदर्शन करतील. २६ व २७ डिसेंबर रोजी कोळोशी गुहा, देवगड येथील कातळशिल्पे आणि बारसू, साखरकोंभे, पन्हाळे येथील शिल्पे पाहतील.

१० कातळशिल्पे लवकरच राज्य संरक्षित

रत्नागिरी जिल्ह्यातील १९ कातळ खोदशिल्पे राज्य संरक्षित व्हावीत, म्हणून पुरातत्त्व विभागाने प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. यातील परिपूर्ण १० प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाकडे असून त्यावर पुढील कार्यवाही सुरू आहे. जागतिक वारसा होण्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उर्वरित कातळशिल्पांनाही संरक्षण मिळण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत.

रुंढेतळी, सोलगाव, रामरोड, चवे देऊड, कशेळी, बारसू, उक्षी व उमरे येथील कातळ खोदशिल्पांचे प्रस्ताव सांस्कृतिक खात्याकडे पोहोच झाले आहेत. तसेच उमरे, कापडगाव, जांभरूण, देवाचे गोठणे, पोचरी, रुंढे तळी, देवीहसोळ, सोगमवाडी येथील कातळशिल्पांचे प्रस्ताव पाठवले जाणार आहेत. आढळलेली सर्व शिल्पे ही खासगी जागेत आहेत. ती संरक्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहेत. रत्नागिरी तालुक्‍यातील उक्षी येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी एकत्र येऊन हत्तीचे कातळशिल्प संरक्षित केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com