'तारिख पें तारिख' अजून किती वर्षे वाट पाहायची ?

demand of delayed teachers recruitment immediately start in ratnagiri
demand of delayed teachers recruitment immediately start in ratnagiri

रत्नागिरी : तत्कालीन सरकारने शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला खरा मात्र त्यातही  मागासवर्गीयांच्या 50 टक्के पदांची कपात करण्यात आली. ही रिक्त पदे याच भरतीत भरण्यात यावीत आणि रखडलेली भरती पूर्ण करावी, असे साकडे राज्यातील डीएड्, बीएड् धारकांच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना घातले. 2010 नंतर शिक्षकभरती पवित्र पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय 2017 साली घेण्यात आला. 

डिसेंबर 2017 पासून शिक्षक भरतीचे भिजत घोंगडे कायम आहे. प्रशासनाच्या रेंगाळलेल्या कारभारामुळे आता ही भरती कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. कोरोना महामारीमुळे आर्थिक उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने 4 मे 2020 रोजी वित्त विभागाच्या एका पत्रकाद्वारे नोकरभरतीवर स्थगिती आणण्यात आली. यामुळे राज्यभरातील लाखो डीएड्, बीएड् धारकांनी संताप व्यक्त केला. 

कोरोनाचे कारण सांगून भरती प्रक्रियेला जी स्थगिती दिली आहे, त्यातून शिक्षक भरतीला वगळण्यात यावे यासाठी राज्यभरातून सोशल मीडियावर चळवळ उभी राहिली आहे. वेगवेगळे हॅशटॅग वापरून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. दहा वर्षे भरतीसाठी वाट बघणार्‍या तरुणाईला न्याय द्या, 2017 पासूनची लांबवलेली प्रक्रिया पूर्ण करा, मागासवर्गीयांवरील अन्याय दूर करा अशी मागणी राज्यातील लाखो डीएड्, बीएड्धारक करत आहेत.

 रखडलेली व कोरोनामुळे आर्थिक कारण देऊन स्थगित केलेली शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी, मागासवर्गीयांच्या कपात केलेल्या 50% जागा याच भरतीत भरण्यात याव्यात यासाठी राहुल खरात व सहकार्‍यांनी शासकीय स्तरावर पाठपुरावा करण्याचे काम सुरूच ठेवले आहे. 25 ऑगस्ट रोजी मुंबईत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट या शिष्टमंडळाने घेतली. उर्वरित शिक्षक भरतीला परवानगी देण्याची विनंती यावेळी आबा माळी, दत्ता नागरे, योगेश जाधव, गजानन बहिवळ, राहूल खरात यांनी केली. ना. मुश्रीफ यांच्याकडे लाखो डीएड्, बीएड् धारकांच्या व्यथा मांडण्यात आल्या. पुढील आठवड्यात उर्वरित शिक्षकभरतीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. 

अजून किती वर्षे प्रक्रिया लांबवणार?

12 हजार शिक्षकांची पदे भरणार अशी घोषणा करून 2017 पासून सुरू असलेली भरती अद्याप पूर्ण झालेली नाही. पहिली निवड यादी 9 ऑगस्ट 2019 ला जाहीर झाली. 16 ऑगस्ट रोजी जाहीर होणारी निवड यादी अद्याप लांबली आहे. भरतीतील केवळ अडीच ते तीन हजार पदे पहिल्या निवड यादीतून भरली गेली. परंतु दुसरी यादी व उर्वरित प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे निम्म्याहून अधिक पदांसाठी पात्र उमेदवार वाट पाहत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com