आमिषे दाखवली तरी भाजपचीच सत्ता ; संजू परब

माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संजू परब; आमदार केसरकर यांच्यावर टीका
Despite the lure BJP power Sanju Parab Sawantwadi
Despite the lure BJP power Sanju Parab Sawantwadisakal

सावंतवाडी : वारंवार निंदा झाली तरी जनतेची फसवणूक करणे हा आमदार दीपक केसरकरांचा धंदा आहे. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर कितीही आमिषे दाखवली तरी पालिकेवर भाजपचीच सत्ता येणार असल्याची टीका माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संजू परब यांनी केली.

गेली बारा वर्ष महिलांना रोजगार देऊ न शकलेले महिला सबलीकरणाची भाषा करत आहेत. बोटिंग प्रकल्प सुरु करणारे केसरकर एवढी वर्ष गणपती विसर्जनाचे तराफे बदलू शकले नाहीत. उलट आम्ही खरेदी केलेल्या बोटीतून त्यांनी जलसफर करावी लागली. त्यामुळे यापुढे तरी केसरकरांनी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करू नये, असेही श्री. परब म्हणाले.

श्री. परब यांनी आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत आमदार केसरकर त्यांच्यावर टिकास्त्र सोडले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, भाजप जिल्हा चिटणीस मनोज नाईक, माजी नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी आदी उपस्थित होते.

श्री. परब म्हणाले, "आमदार केसरकर हे सध्या सावंतवाडीतील जनतेला विकासकामांची आश्वासने देत आहेत. येथील केशवसुत कट्ट्याला वेगळे स्वरूप देण्याबाबतची घोषणा त्यांनी केली; मात्र हे करत असताना हा कट्टा २०२० मध्ये पालिकेच्या आर्किटेककडून धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता. मग त्या ठिकाणी केसरकर कोणत्या आधारे काम करणार आहेत. उद्या सकाळी एखादी दुर्घटना घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार पालिकेचे मुख्याधिकारी राहणार असून त्यांनी शिवसेनेच्या शाखा प्रमुखासारखे काम करू नये. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या चबुतराच्या कामाची वर्क ऑर्डर देऊनही मुख्याधिकार्‍यांनी काम थांबवले. जर काम थांबायचे होते तर वर्क ऑर्डर दिलीच का? त्यामुळे येत्या १९ फेब्रुवारीपर्यंत चबुतराचे काम सुरू न झाल्यास प्रांताधिकार्‍यांना घेराव घालू. आज बॅरिस्टर नाथ पै सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम मुख्याधिकार्‍यांनी रोखून ठेवले आहे. कारिवडे येथील कचरा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे काम आम्ही केले; परंतु त्याचे उद्घाटन मुख्याधिकारी यांच्यामुळे करता आले नाही."

श्री. परब पुढे म्हणाले, "महिला सबलीकरणाची भाषा आमदार केसरकर करत आहेत. महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार असे त्यांचे म्हणणे आहे; परंतु गेल्या बारा वर्षात अशा घोषणा त्यांनी बहुतेकदा केल्या; मात्र त्या पूर्ण करू शकले नाहीत. आम्ही सत्तेत आल्यानंतर वैश्यवाडा येथील बंद असलेले महिला केंद्र सुरु केले; मात्र आमदार केसरकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी उद्घाटन केले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी कितीही आमिषे दाखवली तरी येथील जनता त्यांच्या आमिषांना बळी पडणार नाही. येथील तलावात नव्याने बोटी आणताना आणि आणल्यावर सुद्धा शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यावेळी विरोध केला होता; परंतु त्याच बोटीतून काल ते नगरसेवक कसे काय फिरले? आज आम्ही माजी लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे एक वेळ पालिकेत व सामान्याचे काम घेऊन जाऊ शकतो; परंतु पालिकेमध्ये राजकीय बैठका घेऊ शकत नाही; मात्र आज पालिकेत शिवसैनिक मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसून बैठका घेतात ही वस्तुस्थिती असून असे प्रकार बंद झाले पाहिजेत अन्यथा आम्ही सर्व पदाधिकारी पालिकेमध्ये जाऊन ठाण मांडून बसणार."

तलावाचे विद्रूपीकरण होणार नाही का?

सावंतवाडी मोती तलावाच्या काठावर आठवडा बाजार भरवल्यानंतर मोती तलावाची झोपडपट्टी बनवली, अशी टीका आमदार केसरकर यांनी आमच्यावर केली होती. मात्र, हेच केसरकर आज मोती तलावाच्या काठावर खाऊगल्ली उभारणार आहेत. अशा वेळी तलावाचे विद्रूपीकरण होणार नाही का? असा सवालही परब यांनी उपस्थित केला.

साळगावकरांना सोबत घेऊन फिरण्याची वेळ

आमदार दीपक केसरकर यांनी संजू परब हा विषय माझ्यासाठी डीलीट झाला, असे म्हटले होते; परंतु केसरकरांनी मला डीलीट केले असते तर आतापासूनच त्यांना ज्या बबन साळगावकरांनी त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली होती, त्यांना घेऊन नागरिकांच्या दारोदारी जाण्याची वेळ आली नसती, अशी टीकाही परब यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com