मुक्तीनंतर थक्क करणारी गोव्याची वाटचाल

Development In Goa After Liberation Konkan News
Development In Goa After Liberation Konkan News

पणजी/दोडामार्ग - गोवा मुक्तीनंतर या राज्याच्या प्रगतीला वेग आला; पण या प्रगतीमध्ये मूळ गोमंतकीयांबरोबरच महाराष्ट्रासह इतर जवळच्या राज्यांमधून नोकरीनिमित्त आलेल्यांचा वाटाही मोठा आहे. मुक्तीनंतरची गोव्याची वाटचाल थक्क करणारी आहे.

गोवा म्हटल्यावर विकसित झालेले राज्य कोणाही भारतीयाच्या नजरेसमोर येते. गोवा हे नाव उच्चारल्यावर जगाच्या कानाकोपऱ्यात पर्यटनस्थळरूपी गोवा नजरेसमोर येतो हा भाग वेगळा. देशाला विकासाचे परिमाण जणू गोवा घालून देत आहे, तसा विकास राज्याने अनुभवला आहे. मुक्तीनंतरच्या काळात केवळ पायाभूत सुविधाच नव्हेत, तर वैद्यकीय, शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सगळ्याच पातळ्यांवर गोव्याने मोठे परिवर्तन अनुभवले आहे. पोर्तुगीजांच्या जोखडाखालील गोवा, गोवा संघराज्य आणि गोवा घटक राज्य असा हा प्रवास आहे. त्यात अनेक टप्पे आले, ते लिलया पार केले गेले आहेत.

गोव्याची लोकसंख्या...

हे सारे पाहताना, मागे वळून पाहिल्यास वेगळाच गोवा दृष्टीस पडतो. आज गोव्याची लोकसंख्या १६ लाखांवर पोचली तरी १९७१च्या जनगणनेनुसार ती केवळ ४ लाख ३१ हजार २१४ होती. त्याच्याही मागे गेल्यास १८५१ मध्ये झालेल्या जनगणनेत गोव्याची लोकसंख्या केवळ ३ लाख ६३ हजार ७८८ होती. गोव्यात पहिली जनगणना १८५० मध्ये झाली होती; मात्र त्याची आकडेवारी उपलब्ध नाही. १८८१च्या जनगणनेत लोकसंख्या ४ लाख ६ हजार ७५७ नमूद करण्यात आली होती. सरकारी आकडेवारीनुसार गोव्याच्या लोकसंख्या वाढीचा दर १९२० ते १९४० दरम्यान ७.०५ टक्‍के होता. तर १९४०-१९५० मध्ये तो १.२१ टक्के होता. गोवा मुक्तीनंतर हा दर अचानक वाढला आणि १९६०-१९७० दरम्यान हा दर ३४.७ टक्के झाला होता.

गोव्यात वेतन जास्त हे मोठे आकर्षण

लोकसंख्येची दरवाढ आणि विलीनीकरणाची मागणी याचा जवळचा संबंध आहे. १९६१ मध्ये गोवा मुक्त झाला आणि १९६३ मध्ये गोव्यात लोकनियुक्त सरकार आले. तोवरच्या काळात गोव्यात लष्करी राजवट होती. त्या दरम्यानच्या काळात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ येथून सरकारी कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आणले गेले. शेजारील भागातील दहावी झालेले (त्यावेळची अकरावी मॅट्रिक) अनेक तरुण गोव्यात आले. १९६३ मध्ये लोकनियुक्त सरकार सत्तेवर आल्यावर गोव्यात राज्य कारभार करण्यासाठी शिक्षित मनुष्यबळच नाही असे लक्षात आले. त्यामुळे या ना त्या कारणाने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळमधील कर्मचारी गोव्यातच स्थिरावले. त्याला आणखीन एक कारण म्हणजे गोवा त्यावेळी केंद्रशासित प्रदेश होता. सर्वच पदांना केंद्र सरकारची वेतनश्रेणी लागू होत असे. शेजारील राज्यांच्या तुलनेत गोव्यात वेतन जास्त हे मोठे आकर्षण होते.

परदेशात हजारो कुटूंबाचे स्थलांतर

अशा पद्धतीने गोव्यात हजारोजण आले, स्थायिक झाले. याच दरम्यान मूळ गोमंतकीय असलेल्यांनी गोव्याबाहेर जाणे पसंत केले. पोर्तुगाल, मोझांबिक, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, माकाव, ब्रिटन आदी देशात हजारो कुटुंबे स्थलांतरीत झाली. ती किती कुटुंबे स्थलांतरीत झाली याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही पण परराज्यातील लोक ज्या संख्येने आले त्याच संख्येने गोमंतकीयही इतर ठिकाणी गेल्याचे मानले जाते. यामुळे आजच्या मूळ गोमंतकीय समाजात मूळ गोमंतकीय किती हा मोठा प्रश्‍न आहे.

सरमिसळ झालेल्यांचाच विरोध 
गोवा मुक्तीनंतर पोलिस दलात कर्नाटकातील तरुणांची तर शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक पदांवर महाराष्ट्रातील तरुण आले. अभियंता पदांवर केरळमधील तर अंग मेहनतींच्या कामांवर आंध्रप्रदेशातील तरुण आले. गेल्या १० वर्षांत व्यापाराच्या निमित्ताने गुजराती, राजस्थानी, पंजाबी गोव्यात शिरले. असा हा सरमिसळ झालेला हा समाजच आता अशा कोणत्याही विलीनीकरणाला विरोध करू लागला आहे.

संबंधित बातम्या - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com