सागरी महामार्ग दुपदरीकरण चार टप्प्यात 

सागरी महामार्ग दुपदरीकरण चार टप्प्यात 

कणकवली - कोकणचा महासेतू असलेल्या करंजा (रायगड) ते आरोंदा (सिंधुदुर्ग) सागरी महामार्गाचा अडीच हजार कोटींचा डिटेल प्रोजेक्‍ट रिपोर्ट (डीपीआर) शासनाला सादर झाला आहे. हा महामार्ग चौपदरी प्रस्तावित होता; मात्र भुसंपादनातील अडथळे लक्षात घेता दुपदरी होणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर केला असून, लवकरच भूसंपादन प्रक्रियेला सुरवात होणार आहे. चार टप्प्यात 540 किलोमिटरचा हा सागरी महामार्ग पूर्णत्वास जाणार आहे. 

मुंबई-गोवा महामार्गाला समांतर असणारा किनारपट्टीवरील हा सागरी महामार्ग एकसंधपणे जोडण्यासाठी 82 पुलांची आवश्‍यकता आहे. यात सिंधुदुर्गातील 10 पुलांचा समावेश आहे. सागरी वाहतूक बंद पडल्यानंतर किनारपट्टीवरील शहरांचाही विकास थांबला. सागरी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर या शहरांच्या व किनारपट्टीवरील गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. 
कोकणकिनारपट्टीवर प्रस्तावित सीवर्ल्ड, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, नाणार रिफायनरी, विजयदुर्ग आंतरराष्ट्रीय बंदर हे प्रकल्प प्रस्तावित आहेत.

या प्रकल्पांसाठीही हा सागरी महामार्ग महत्वपूर्ण ठरणार आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळही सागरी महामार्गालगतच आहे. 
तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या बॅ. अंतुले यांनी सागरी महामार्गाच्या कामाला चालना दिली होती. नंतर खाड्यांवरील पूल रखडल्याने गेली 35 वर्षे हा प्रकल्प अपूर्णच राहिला. केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सागरी महामार्गाला पुन्हा चालना दिली.

या मार्गाच्या फिजिब्लिटी सर्व्हेसाठी तीन कंपन्यांची नियुक्‍ती केली. यात मुंबई-गोवा महामार्गाचा आराखडा तयार केलेल्या व्हायंटस, एस. एन. भोबे आणि चॉईस या कंपन्यांनी आपला अहवाल केंद्राला सादर केला असून लवकरच दुपदरीकरणासाठी आवश्‍यक असलेल्या क्षेत्रासाठीची भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे. 

 असा आहे महामार्ग 
मांडवा-पोर्ट, रेवस, अलिबाग, मुरुड, डिगी-पोर्ट, बाणकोट, दापोली, गुहागर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, जैतापूर, देवगड, मालवण आणि वेंगुर्ले असा हा 540 किमीचा महामार्ग प्रस्तावित आहे. 

 82 पूल प्रस्तावित 
सागरी महामार्गावर 82 पूल प्रस्तावित आहेत. यात रायगड जिल्ह्यात 41, ठाणे जिल्ह्यात 13, रत्नागिरीत 18 अणि सिंधुदुर्गात 10 पुलांचा समावेश आहे. 

 पर्यटन सुविधा 
सागरी महामार्गावर प्रत्येक 10 कि.मी.वर स्वच्छतागृह, वाहन पार्किंग टर्मिनस आणि वे साईट ऍम्युनिटी असणार आहे. तसेच मुंबई गोवा महामार्ग आणि सागरी महामार्ग यांना जोडणारे रस्त्यांचेही दुपदरीकरण प्रस्तावित आहे. यात नांदगाव-देवगड, कणकवली-आचरा, कासार्डे-तळेरे, कसाल-मालवण आदींचा समावेश आहे. 

भूसंपादनात अडथळे शक्‍य 
किनारपट्टीवरील या महामार्गालगत अनेक गावच्या बाजारपेठा, वस्त्या आणि माड बागायती आहेत. याठिकाणी भूसंपादनावेळी विरोध होण्याची शक्‍यता असल्याने आराखड्यात दाट वस्ती आणि बाजारपेठांच्या ठिकाणी पर्यायी मार्ग सुचविले आहेत. 

सागरी महामार्गासाठी कोकण विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही 35 वर्षे लढा देत आहोत. मुंबई गोवा महामार्गाप्रमाणेच सागरी महामार्गासाठीही केंद्राने भरीव आर्थिक तरतूद करावी. तरच किनारपट्टीवरील गावे विकासाच्या नकाशावर येतील.
- मोहन केळुसकर,
अध्यक्ष, कोकण विकास आघाडी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com