देवगड: तालुक्यातील किनारपट्टी भागाला पावसाने आज चांगलेच झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाला. यामुळे पुन्हा एकदा मच्छीमारी समस्यांच्या गर्तेत सापडण्याची लक्षणे आहेत. समुद्रातील खराब हवामानामुळे मच्छिमारी नौका बंदरात परतल्या. तसेच बाहेरील राज्यातील नौकाही बंदरात आश्रयाला आल्या आहेत. बाहेरच्या सुमारे ५२ नौका बंदरात आश्रयाला आल्या आहेत.
किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. अलीकडे काही दिवस किनारपट्टी भागातील वातावरण सतत बदलते राहिले आहे. जोरदार पाऊस असल्याने मध्यंतरी सुरुवातीच्या टप्प्यावरच असताना मच्छिमारीला ब्रेक लागला. समुद्रात वाढळसदृश्यस्थिती निर्माण झाल्यामुळे सुरक्षितता म्हणून मच्छीमारी नौका बंदरात परतल्या.
त्यावेळी गुजरात येथील मच्छिमारी नौका येथील बंदरात आश्रयासाठी आल्या होत्या. त्यानंतरही सातत्याने वातावरणात बदल होत राहिल्याने बाहेरील मच्छीमारी नौकांची संख्या वाढतच राहिली. कालपर्यंत येथील बंदरात बाहेरील राज्यातील सुमारे 48 मच्छिमारी नौका दाखल झाल्या आहेत.
त्यावर एकूण 399 मच्छिमार असल्याची माहिती सागरी पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कुंभार यांनी दिली. यामध्ये गुजरात येथील मच्छिमारी नौकांचा समावेश आहे. आज वातावरण आणखीन खराब झाल्याने यामध्ये आणखी चार मच्छीमारी नौकांची वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यात आतापर्यंत पा्वसाने तीन हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला आहे.
पावसाने मच्छीमारी थंडावल्याने उपलब्ध मासळीचे दर कडाडले आहेत. सध्या गणेशोत्सव सुरु असल्याने मुंबईकर चाकरमानी तालुक्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे मासळीला वाढती मागणी आहे. पर्यायाने दर वधारले आहेत. दरम्यान, पाऊस आणि गणेशोत्सव यामध्ये बाजारातील वर्दळ थंडावली होती. दरम्यान, बाहेरच्या राज्यातील नौका बंदरात आल्याने स्थानिक सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.