शेतकऱ्यांकडील हापूस थेट सुरत मार्केटला

शेतकऱ्यांकडील हापूस थेट सुरत मार्केटला

कृषी उत्पन्न बाजार समितीचा पुढाकार - वाशीला पर्याय; दर चांगला मिळण्यासाठी प्रयत्न
रत्नागिरी - वाशी मार्केटला पर्याय निर्माण करून देताना आंबा बागायतदारांना चांगला दर मिळावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने पावले उचलली आहेत. गुजरातला आंबा पाठविण्यासाठी रत्नागिरीतील काही बागायतदार सज्ज झाले आहेत. सव्वाशे पेटी आंबा वाशीला रवाना झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने यासाठी सुरत बाजार समितीबरोबर संवाद साधला होता. त्याला यश आले आहे; मात्र दराबाबत अद्यापही बागायतदार समाधानी नाहीत. त्यासाठी बाजार समिती सभापती गजानन पाटील यांच्याकडून चर्चा सुरू आहे.

कोकणातील सर्वाधिक आंबा वाशी मार्केटला पाठविण्यात येतो. ही पारंपरिक प्रथा आहे. त्यांच्याकडून जो दर दिला जातो, तो योग्य मानून बागायतदारही त्यावर समाधानी राहतात. यामध्ये प्रत्यक्ष बागायतदाराला म्हणावा तसा फायदा होत नाही. शसानाकडूनही दलालांना रोखण्यासाठी थेट शेतकऱ्याचा आंबा व्यापाऱ्यांकडे कसा पाठविता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरत मार्केट विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. बाजार समितीचे सभापती गजानन पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पाहिले पाऊल उचलले. निर्यातदार आणि बागायतदार यांची संयुक्‍त बैठक झाली. त्यानंतर श्री. पाटील यांनी सुरतच्या बाजार समिती सभापती आणि तेथील निर्यातदारांशी संवाद साधला. सकारात्मक चर्चेअंती या हंगामात आंबा पाठविण्यास हिरवा कंदील दिला होता.

हंगामापूर्वी झालेल्या चर्चेनुसार रत्नागिरीतील काही बागायतदारांनी सव्वाशे पेट्या चारच दिवसांपूर्वी सुरत मार्केटला पाठविल्या होत्या. तिथे सहा डझनाच्या पेटीला १८०० ते २००० रुपये, सात डझनाच्या पेटीला १६०० रुपये, आठ डझनाच्या पेटीला १५०० रुपये दर मिळाला आहे. ट्रान्स्पोर्टद्वारे हा आंबा रत्नागिरीतून सुरत मार्केटला पाठविण्यात आला आहे. सुरत बाजार समितीने तेथील व्यापाऱ्यांशी चर्चा करून तो आंबा विक्रीसाठी ठेवला आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये दर चांगला मिळत असल्याने बागायतदारांकडून सुरतसाठी दुय्यम स्थान दिले आहे. 

चांगला आणि दर्जेदार आंबा सुरतला पाठविला जावा, अशी मागणी तेथील व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे. त्यादृष्टीने बाजार समितीने पावले उचलली असून रत्नागिरीतील बागायतदारांशी संवाद साधणार आहे. आंबा थेट सुरतमध्ये गेला, तर शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळेल असा विश्‍वास सभापती पाटील यांनी व्यक्‍त केला आहे.

सुरतमध्ये आंब्याला पाहिजे तसा दर मिळालेला नाही. दर्जेदार आंबा पाठविण्याची बागायतदारांची तयारी आहे; परंतु त्यासाठी दर निश्‍चिती होणे आवश्‍यक आहे. अन्यथा वाशी सोडून अन्यत्र जाणे योग्य ठरणार नाही.
- प्रसन्न पेठे, बागायतदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com