मालवण - खोल समुद्रात "शेळ' पडल्याने थंडीने माशांचे थवेच्या थवे अन्नाच्या शोधात सिंधुदुर्गाच्या किनाऱ्याकडे सरकले आहेत. त्यामुळे मासळीचा कॅच चांगला मिळत आहे. मात्र, याच सुगीच्या काळात पर्ससीनच्या घुसखोरीने स्थानिक मच्छीमार हैराण झाले आहेत.
श्रावणातील गारव्याचे परिणाम सागरी जिवांवर होतात. खोल समुद्रातील करंट (प्रवाह) या काळात बदलतात. यामुळे खोल समुद्रात गारवा निर्माण होतो. विविध प्रजातींच्या मासळी थंडीपासून बचावासाठी किनाऱ्याकडे येतात. समुद्रात निर्माण होणाऱ्या गारव्यास स्थानिक भाषेत "शेळ लागणे' असे म्हटले जाते. हा काळ मच्छीमारांना सुखावणारा असतो.
कारण याच काळात किनारपट्टीवर रापणीच्या जाळ्यात मासळीची चांगली कॅच मिळते. याचदरम्यान मत्स्य प्रजननाचा काळ संपल्यानंतर मासळीचे थवेच्या थवे किनाऱ्यालगत येतात. किनारी भागात पाण्यात असलेली ऊब माशांना आकर्षित करते. हा साधारण कालावधी ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत असल्याने मत्स्य हंगामाची सुरवातही सुखावह होते. सध्या हा हंगाम सुरू असल्याने किनारपट्टीलगत मासळी मोठ्या प्रमाणात मिळत आहे. मात्र, पर्ससीन मासेमारी करणारे कायदा धाब्यावर बसवून किनारपट्टीकडे अतिक्रमण करत आहेत. याचा फटका रापणीसह पारंपरिक मच्छीमारांना बसत आहे.
याबाबत मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर म्हणाले, 'या काळात खोल समुद्रात सूर्यप्रकाश कमी पडत असल्यामुळे तापमानाबरोबरच खाद्य शोधासाठी ते किनाऱ्यावर झुंडीने येतात. समुद्रात शेळ लागली की पारंपरिक मच्छीमारांच्या जाळीत अपेक्षित मासळी मिळते. शहरात दोन दिवसांपूर्वी खवळे माशाचा बंपर कॅच मिळाला. खोल समुद्रातील खवळे, पापलेट, कोळंबी, तारली, वागळी, मोरी, काडय आदी प्रजातींची मासळी 10 ते 12 वाव समुद्रात वास्तव्य करण्यासाठी येते. त्यामुळे पर्ससीन किंवा आधुनिक मासेमारीच्या नौकांची सागरी जलधी क्षेत्रातील घुसखोरी रोखायला हवी.''
खोल समुद्रात पाण्याचे प्रवाह बदलण्याची प्रक्रिया ऑगस्टपासून सुरू होते. यात समुद्रात गारवा तयार होतो. खोल समुद्रात सूर्यप्रकाशाची किरणे पोचत नसल्याने माशांना खाद्य मिळत नाही. त्यामुळे मासळीच्या झुंडी किनाऱ्यालगत मिळणाऱ्या सूर्यप्रकाश, वनस्पतीजन्य, प्राणिजन्य प्लवंग खाण्यासाठी येतात. समुद्रातील शेळ लागणे ही एक नैसर्गिक साखळी आहे.
- केतन चौधरी, मत्स्यजीव अभ्यासक
|