रायगड जिल्ह्यात इतक्या गौराई-गणपती मूर्तींचे होणार विसर्जन; प्रशासनाकडून नियोजन

अलिबाग : येथील जिल्ह्याच्या ठिकाणी समुद्रकिनारी नगरपालिकेच्यावतीने विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे.
अलिबाग : येथील जिल्ह्याच्या ठिकाणी समुद्रकिनारी नगरपालिकेच्यावतीने विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे.

अलिबाग : पाच दिवसांच्या बाप्पाचे आणि दीड दिवसाच्या गौराईच्या आगमनानंतर गुरुवारी गौरी गणपतीचे विसर्जन जिल्ह्यात ठिकठिकाणी होणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचे सावट असल्याने त्याचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नियमात राहूनच विसर्जन करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनासह पोलिस प्रशासनाने विसर्जनाच्या तयारीचे नियोजन केले आहे. गौरींसह 69 हजार 19 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी प्रशासन सज्ज आहेत. 

गणरायाचे 22 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात घरोघरी आगमन झाले. कोरोनाचे संकट असल्याने यंदा ठिकठिकाणी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी सांस्कृतिक व अन्य मनोरंजन, सामाजिक उपक्रमही रद्द करण्यात आले. मंगळवारी गौरीचे आगमन झाले. महिलांनी नवनवीन कपडे परिधान करून नैवेद्य दाखवून गौराईचे स्वागत केले. जिल्ह्यामध्ये बुधवारी 14 हजार 423 गौरीच्या मूर्ती, फोटो, मुखवट्याची प्रतिष्ठापना केली. 

सहा दिवसांच्या गणरायासह गौराईला गुरुवारी दुपारनंतर निरोप देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे 78 तलाव, 17 नदी, समुद्र व खाडींमध्ये तसेच घराजवळ एखाद्या मोठ्या टफात, टाकीमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. पोलिस प्रशासनासह जिल्हा प्रशासनही विसर्जनासाठी सज्ज झाले आहे. 

अलिबाग समुद्रकिनारा सज्ज 
समुद्रकिनारी गणेशमूर्ती व गौरीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अलिबाग नगरपालिकेने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोनाचे संकट असल्याने समुद्रकिनारी गर्दी न होण्यासाठी किनाऱ्यापासून काही अंतरावर मंडप बांधले आहे. त्याठिकाणी आठ टेबल ठेवले असून, त्यातील चार टेबल मूर्ती घेण्यासाठी तर चार टेबल समुद्रातील वाळू, पाणी देण्यासाठी आहेत. विसर्जनसाठी 50 स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे. बोटीमध्ये मूर्ती ठेवून खोल समुद्रात त्यांचे विसर्जन या स्वयंसेवकांद्वारे केले जाणार आहे. समुद्रकिनारी निर्माल्य संकलन कक्ष उभारण्यात आले असून, त्याठिकाणी आठ कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याची माहिती मुख्याधिकारी महेश चौधरी यांनी दिली. 

खोपोलीत कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन 
खोपोली : गुरुवारी गौरी गणपती व मोठ्या संख्येने सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होणार आहे. कोरोनाचे संकट व सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी नगरपालिका व पोलिस विभाग सज्ज झाले आहेत. नगरपालिकेकडून मोबाईल व्हॅनद्वारे निर्माण केलेले कृत्रिम तलाव किंवा सोसायटीमधील गणेशभक्तांनी आपापल्या परिसरात कृत्रिम तळे किंवा विसर्जन टाकीत मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

शहरातील विसर्जन घाटावर चोख व्यवस्था करण्यात आली आहे. खोपोली नगरपालिका क्षेत्रात गुरुवारी 14 सार्वजनिक, तर हजारो घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. यातील सर्वांत अधिक खोपोली विरेश्वर मंदिर तळ्यात विसर्जन होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या विसर्जन घाटावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खोपोली पोलिसांकडून विशेष देखरेख व नियोजन केले आहे. नगरपालिकेकडून विविध ठिकाणी कृत्रिम तळे निर्माण केले आहेत. पर्यावरण प्रेमी आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भक्तांनी शक्‍यतो मोबाईल व्हॅनचा उपयोग करावा, असे आवाहन नगरपालिकेने केले आहे.

(संपादन : उमा शिंदे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com