वैभववाडी-कोल्हापूर मार्गाला मिळाला ‘हिरवा कंदील’

वैभववाडी-कोल्हापूर मार्गाला मिळाला ‘हिरवा कंदील’

सावंतवाडी - बहुचर्चित वैभववाडी-कोल्हापूर या रेल्वेमार्गाला अखेर रेल्वेबोर्डाची अंतिम मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या १०७ किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम गेली दोन वर्षे रखडले होते. आज झालेल्या बैठकीला रेल्वेमंत्री पीयूष गोयल, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गती दिली होती. २०१५ मध्ये कोकण रेल्वेमार्फत जे. पी. इंजिनीअरिंगला या मार्गाच्या प्राथमिक सर्वेक्षणाचे काम देण्यात आले. सॅटेलाईट सर्व्हे करून कोकण रेल्वेमार्फतच याचा अहवाल केंद्राला सादर करण्यात आला.

यानंतर २०१६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात श्री. प्रभू यांनी या मार्गासाठी पहिल्या टप्प्यातील आर्थिक तरतूद जाहीर केली. हा प्रकल्प कोकण रेल्वेकडे न देता मध्य रेल्वेमार्फत पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. एसपीव्ही योजनेतून केंद्र आणि राज्य शासनाची संयुक्त कंपनी स्थापन करून हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय झाला. त्या वेळी यासाठी ३२०० कोटी खर्च अपेक्षित होता. मात्र, गेली दोन वर्षे या प्रकल्पाबाबतची प्रक्रिया थंडावली होती.

केंद्रीय वाणिज्यमंत्री प्रभू यांनी नुकत्याच झालेल्या कोल्हापूर दौऱ्यात या प्रकल्पाची पूर्तता करण्याची ग्वाही कोल्हापूरवासीयांना दिली होती. त्यानंतर दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, श्री. प्रभू, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांच्यासह रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात हा प्रकल्प वेगाने पुढे नेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
या पार्श्‍वभूमीवर केंद्राने या मार्गाला मंजुरी दिली आहे. याला केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, की या प्रकल्पाची लांबी १०७ किलोमीटर असणार आहे.

प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यापासून याचा मी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. सुरवातीला पाचशे कोटींची मंजुरी दिली होती. या प्रकल्पाला आता केंद्राची मंजुरी मिळाली आहे. यामुळे कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्र जोडला जाईल. मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीला याचा मोठा फायदा होईल. हा कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न होता. तो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जातील.’’

कसा आहे नवा मार्ग..?
  सिंधुदुर्गातील मार्ग ः वैभववाडी रेल्वेस्थानक- सोनाळी- कुंभारवाडी कुसूर- उंबर्डे - मांगवली- उपळे- ऐनारी
  कोल्हापूरमधील मार्ग ः सैतवडे- कळे- भुये- कसबा बावडा- मार्केट यार्ड 

वैभववाडी ते कोल्हापूर 
  संभाव्य रेल्वेमार्गाची लांबी- १०७ किलोमीटर
  नव्या मार्गातील स्थानकांची संख्या- १० 
  उड्डाणपुलांची संख्या- ५
  बोगद्यांची संख्या- २६
  अंदाजित खर्च- ३२०० कोटी 
  २०१६ च्या अर्थसंकल्पातील तरतूद- २५० कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com