शेतकऱ्यांनो तुम्हाला आता गावातच मिळणार शेतीविषयक योजनांची माहिती

information related to the agricultural policy for farmers in his village in kokan
information related to the agricultural policy for farmers in his village in kokan

मुणगे : शेतकऱ्यांना गावामध्ये शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी, गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या विविध योजना व प्रकल्पामधून हाती घ्यावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी, राज्य ग्रामपंचायत अधिनियमनुसार प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये ग्रामकृषी विकास समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गावातच कृषी विषयक योजनाची माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे. 

ग्रामीण भागात शेती हा महत्त्वाचा व्यवसाय असून अनेक कुटुंबाच्या उपजिवीकेचे साधन आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही शेती व्यवसायशी निगडित असते. परंतु हवामानातील बदल, निसर्गाचा अनियमितपणा, पर्जन्यमान, किडरोग, सुधारित जातींची बियाणी उपलब्ध न होणे, शेती मालाच्या दरामध्ये घसरण होणे आदी कारणांमुळे शेती व्यवसायातून शाश्‍वत उत्पन्न मिळेल, याची खात्री देता येत नाही. या सर्व समस्यांवर विचारविनिमय करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी शासनाने ग्राम कृषी विकास समिती प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्थापन करण्याचा निर्माण घेतला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे सोपे होणार आहे. 

ग्रामीण भागातील काही ठराविक नागरिक पुन्हा-पुन्हा शासनाच्या योजनाचा लाभ घेतात. त्याला चाप बसणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविणे, बियाणे, खते, किड नियंत्रण, यांत्रिकीकरण, संरक्षण, शेती व फळबाग लागवडी विषयक माहिती शेतकऱ्यांना पोहोचविली जाणार आहे. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, रेशीम लागवड आदी शेती पुरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी समितने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित करावयाचे आहे.

पीक काढणी तंत्रज्ञान व बाजारपेठेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी, शेतीसाठी आवश्‍यक कर्जपुरवठा करणाऱ्या बॅंका, सहकारी संस्था यांची माहिती तसेच स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या कृषी विषयक प्रासंगिक समस्थावर विचारविनिमय करून कृषी विभागाच्यावतीने संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. याबाबतची कार्यवाही समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे. कृषी सहायकाच्या समन्वयाने ग्रामसेवकांनी सभेचे आयोजन करायचे आहे. प्रत्येक महिन्यातून किमान एक सभा होणे आवश्‍यक आहे. 


ग्राम कृषी समितीची रचना अशी 

ग्राम कृषी विकास समिती 14 सदस्यांची असणार आहे. त्यामध्ये सरपंच हे त्या समितीचे पदसिध्द अध्यक्ष असणार. उपसरपंच हे त्या समितीचे पदसिध्द सदस्य असतील. ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी हे सदस्य सचिव तर कृषी सहाय्यक हे सहसचिव असणार आहेत. एक - एक ग्रामपंचायत सदस्य, तीन प्रगतशील शेतकरी, त्यामध्ये एक महिला, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष, शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट यांचा एक प्रतिनिधी, महिला बचत गटाचा एक प्रतिनिधी, कृषी पुरक व्यवसायातील दोन शेतकरी आणि तलाठी अशा 14 प्रतिनिधींची ही ग्राम कृषी विकास समिती असणार आहे. या समितीची मुदत ही ग्रामपंचायतीच्या मुदती इतकीच राहणार आहे. नवीन ग्रामपंचायत कार्यकारीणी अस्तित्वात आल्यानंतर 45 दिवसाच्या आत ग्राम कृषी विकास समिती गठीत करणे आवश्‍यक आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com