गावकीचे नैतिक बंधन, जबाबदारीही

गावकीचे नैतिक बंधन, जबाबदारीही

गुहागर - कोकणात कुणबी समाजाने विवाह ठरविण्याला सामाजिक बंधनांचे कोंदण दिले आहे. जात पंचायतींसारखे याचे स्वरूप त्रासदायक नाही. गणपती विसर्जनानंतर लग्नगाठी बांधण्यासाठी वाड्या-वस्त्यांवर चहापाणी कार्यक्रमांना सुरुवात झाली. तुलसी विवाहानंतर मुहूर्त, शिमग्यात साखरपुडा आणि उन्हाळ्याच्या सुटीत विवाह असा पारंपरिक क्रम असतो. 

सुरुवातीला दोन कुटुंबे विवाह जुळवतात. चहापाण्याच्या निमित्ताने नातेवाइकांसह समाजासमोर हे नाते ठेवले जाते. वाडीप्रमुख आणि ज्येष्ठ मंडळींना वधू-वरासह त्यांच्या माता-पित्यांना हे नाते मंजूर असल्याबद्दल जाहीर विचारतात. त्यामागे नात्याला जगजाहीर करण्याचा भाव असतो. स्वाभाविक दोन्ही कुटुंबांवर नैतिक जबाबदारी येते. त्यानंतर दोन्ही घरातील मानपान, दाग-दागिने, लग्न कोणत्या काळात सोयीस्कर आदी ज्येष्ठ ठरवितात. दोन कुटुंबांच्या मनोमिलनामध्ये व्यवहाराचा अडसर दूर करतात.

आर्थिक बाजू कमकुवत असेल, तर ज्येष्ठ मंडळी तोडगा काढतात. वधूचे पालक लग्न लावून देतात. या विषयातही आर्थिक स्थितीचा विचार करून मंडळी निर्णय देतात. हुंडा पद्धत कुणबी समाजाने केव्हाच हद्दपार केली आहे. त्यामुळे चहापाण्याच्या कार्यक्रमात अन्य मागणी नंतर करू शकत नाही. अपवादाने झाली किंवा चहापाण्याचे वेळी ठरलेल्या मुद्द्यांमध्ये गडबड झाली, तर वधू-वरांकडून जमलेली ज्येष्ठ मंडळी अनुचित प्रकारांना आळा घालतात. 

पूर्वांपार चहापाण्याची प्रथा चालत आली आहे. या प्रथेमुळे विवाहासारख्या मोठ्या कार्यात सारा समाज दोन्ही कुटुंबांसमवेत सर्वतोपरी उभा राहतो. कार्यामध्ये, कार्यानंतर आपत्ती आली तर समाजाचा आधार मिळतो. अनेक प्रकारचे आर्थिक खर्च वाचतात. मानसिक ताणतणाव, शारीरिक कष्ट कमी होतात. 
- संतोष घुमे,
असगोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com