मोरवणे धरणाला गळती; तीनशे लोकांचा जागता पहारा

मोरवणे धरणाला गळती; तीनशे लोकांचा जागता पहारा

चिपळूण - तालुक्‍यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मोरवणे धरण पूर्ण क्षमतेने भरले. धरणातील पाणी सांडव्यावरून वाहू लागले. दरम्यान, धरणास लागलेल्या गळतीने पायथ्यास असलेल्या तीन वाड्यातील लोक काल रात्रभर जागून आहे. तिवरे धरणासारखी दुर्घटना घडू नये, यासाठी या तिन्ही वाड्यातील सुमारे तीनशे लोकांचा जागता पहारा सुरू केला आहे. लोकांमधून तीव्र प्रतिक्रिया आल्याने रविवारी सायंकाळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत पाहणी केली आहे.

मोरवणे लघुपाटबंधारे विभागाचे धरण सन २००० मध्ये पूर्णत्वास गेले. तालुक्‍यातील तिवरे धरण फुटल्यानंतर तालुक्‍यातील सर्व धरणांच्या व तेथील दुरुस्तीचा मुद्दा एैरवणीवर आला. तिवरे धरणाच्या तिप्पट क्षमता मोरवणे धरणाची आहे. सुमारे तीन टीएमसी क्षमता असलेले मोरवणे धरण भरून वाहू लागले आहे.

शनिवारी (ता. ६) मुसळधार पाऊस झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणात आवक वाढली. धरणाच्या पायथ्याशी चर्मकारवाडी, बौद्धवाडी, खालचीवाडी आहे. तिन्ही वाड्यांतील लोकसंख्या सुमारे तीनशे आहे. धरणास गळती लागल्याने पायथ्याशी असलेले लोक रात्रभर झोपलेच नाहीत. अधूनमधून धरणावर येत पाहणी करीत होते. ज्येष्ठांनीही भीतीपोटी रात्र जागून काढली. 

दरम्यान, आज जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप चव्हाण यांनी पाटबंधारे कार्यालयात जाऊन दुपारी हंगामा केला. त्यांनी धरणाबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. दुपारनंतर सरपंच मुकुंद चव्हाण, दिलीप चव्हाण यांच्यासह चर्मकारवाडी, बौद्धवाडीतील लोक धरणावर जमले होते.

सरपंच चव्हाण म्हणाले, ‘‘धरणास मोठी गळती लागली आहे. जॅकवेलमधून पाण्याला गळती आहे. गुरववाडीच्या बाजूस धरणास दगडी पिचिंग केलेले नाही. पिचिंगसाठी आणलेले दगड तिथेच साठा करून ठेवले आहेत. धरणातील पाण्याचा दाब याच भागावर येतो. सांडव्याकडील एक बाजू नादुरुस्त झाली आहे. लागलेल्या गळतीकडे पाटबंधारे विभाग लक्ष देत नाही. सिमेंट काँक्रिटच्या जॅकवेलला गळती असून ते पाणी धरणास उभारलेल्या मातीच्या भिंतीखालून झिरपते. तिवरे धरण फुटल्यानंतर तिन्ही वाड्यांतील लोक भयभीत झाले आहेत. गेल्या दोन तीन दिवसांपासून त्यांना रात्रीची झोप नाही. रात्री तरुण मुले धरणावर येऊन परिस्थितीचा अंदाज घेतात.’’

ते म्हणाले, ‘‘पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पाहणी केली. जॅकवेल शेजारी वाढलेले झाडे तेवढीच तोडली. उर्वरित मोठ्या प्रमाणातील झाडी तशीच आहे. गेल्या १९ वर्षात कालव्याची कामे पूर्णत्वास गेलेली नाही. तिथपर्यंत कालवे आहेत, तिथपर्यंत कधी पाणी सोडण्यात आलेले नाही. मग या धरणाचा उपयोग काय? तिवरेसारखी दुर्घटना येथे घडू नये. यासाठी धरणातील पाणी पातळी कमी करावी.’’  

पाटबंधारेकडून नोटीस
मोरवणे धरण पाच जुलैला सकाळी ११.१५ वाजता पूर्ण क्षमतेने भरले. यावेळी धरणाची पातळी ११२ मीटर होती. सांडव्यावरील पाण्याचा विसर्ग ३.७४ घ.मी. प्रती सेकंद इतका होता. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणात मासेमारीसाठी कोणी जाऊ नये, अशी नोटीस सरपंच व पोलिसपाटलांना पाटबंधारे विभागाकडून त्याचदिवशी देण्यात आली होती.

पाणी कमी करण्याबाबत चर्चा करून निर्णय 
दरम्यान, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता खताते व श्री. वाजे यांनी सायंकाळी मोरवणे धरणास भेट दिली. धरण पायथ्याशी असलेल्या गळतीची त्यांनी पाहणी केली. जॅकेवल तसेच सांडव्याची पाहणी करून त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. पाणी कमी करण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com