पावस : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी परिसरात पिंजरा लावून बसलेल्या वनविभागाला हूल देत बिबट्याने आपला मार्ग बदलला आहे. गेले काही दिवस लांजा-पावस मार्गावर बिबट्याचे दर्शन होत असून 18 सप्टेंबरला रात्री या बिबट्याने एका मोटारीचा पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. तसेच शनिवारी (19) सकाळी पावस बायपास रस्त्यावरही बिबट्याने दोघा-तिघांना दर्शन दिले.
पावस, कुंभारघाटी, गणेशगुळे, कुर्धे, मेर्वी, पूर्णगड, मावळंगे आदी भागांत सातत्याने बिबट्याने हल्ला करून मनुष्यप्राण्याला जेरीस आणण्याचे काम केले आहे. त्या दृष्टीने त्याला जेरबंद करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू आहेत. सध्या पावस-पूर्णगड सागरी मार्गावरील बेहेरे टप्पा येथे तिघा दुचाकीस्वारांवर हल्ला झाल्याने वनविभागाने त्या भागात कॅमेरे व पिंजरे बसवत विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. गस्तीच्या माध्यमातून अनेक भागात जंगल भागात मार्गक्रमण करीत असतानादेखील दाटीवाटीच्या जंगली भागामुळे तेथे वावरणे माणसाला मुश्किल बनले आहे.
हेही वाचा - नोकरी हवीय ? वेबसाइटवर करा आधारकार्ड लिंक
बिबट्या हा समंजस व 12 गावचा व्हराडी असल्याने आपला मार्ग वारंवार बदलत असतो, अशी एक अंधश्रद्धा आहे. सध्या बिबट्याने वनविभागाला बेहेरे टप्पा परिसरात केंद्रित करून आपला मार्ग मात्र बदलून पावस-लांजा मार्गाकडे मोर्चा वळवला आहे. चारचाकी गाडीचा पाठलाग केल्याने अनेकजण भयभीत झाले आहेत. त्या परिसरात असलेल्या भातशेतीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचे दिवसाढवळ्या दर्शन घडत आहे. वनविभागाने पावसला पिंजरा बसवला. परंतु वनविभागाचे कॅमेरे व पिंजरे शो च्या वस्तू बनल्या आहेत.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.