स्वाभिमान पक्षाच्या विलीनीकरणावर दीपक केसरकर म्हणाले,...

स्वाभिमान पक्षाच्या विलीनीकरणावर दीपक केसरकर म्हणाले,...

सावंतवाडी - नारायण राणे यांच्याशी माझा वैयक्‍तिक लढा नसुन त्यांच्या प्रवृत्तीशी आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीन करावा लागतो हा नियतीचा डाव आहे. ते आज योग्य पक्षात गेले. त्यांनी भाजप आणि संघाची विचारधारा आत्मसात करावी, असा सल्ला मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिला.

भाजपमध्ये बंडखोरी करून रिंगणात उभे असलेल्या अपक्ष उमेदवार राजन तेलींची पक्षातुन हकालपट्टी करण्यात आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. येत्या दोन दिवसात भाजपचे कार्यकर्ते युतीच्या प्रचारात दिसतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

मंत्री केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी संपर्क प्रमुख शैलेश परब उपस्थित होते. यावेळी आदीत्य ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावुन काम करण्याची नितेश राणे यांनी दर्शविलेली इच्छा आणि राणेंच्या पुत्रामध्ये दिसुन आलेल्या कथीत मतभेदाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, ""तो त्यांच्या कुटुंबामधील वैयक्‍तिक वाद आहे. कोणाच्या कुटुंबात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्यापैकी मी राजकारणी नाही. ते एक कुटुंब असुन ते कुटुंबच राहीले पाहीजे. राणेंशी माझा वैयक्‍तिक कोणताही वाद नाही. माझा वाद राहीला तो त्यांच्या प्रवृत्तीशी व त्यांच्या विचारधारे विरोधात आहे. शिवाय त्यांनी बाळासाहेबांवर केलेल्या टिकेची जाहीर माफी मागितल्यास शिवसेना व राणे यांच्यातील वाद मिटेल.''

राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन झाला याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, ""नियतीने खेळलेला हा डाव असुन ज्यांनी इतरांचे पक्ष विलिन करण्याची भाषा केली त्यांनाच आज आपला पक्ष विलीन करण्याची वेळ आली. त्यांना भाजप प्रवेशासाठी सहा महीने तारखा घ्याव्या लागल्या. केवळ मुख्यमंत्र्यांनी अभय दिले म्हणुन त्यांचा भाजप प्रवेश झाला. भाजपच्या शिस्तीचे पालन करणे हे राणेंचे कर्तव्य आहे आणि ते जरी केले तरी पुर्वीचे प्रकार जिल्ह्यात बंद होतील.''

ते म्हणाले, ""भाजपचे अधिकृत उमेदवार नसतानाही राजन तेली यांनी ज्याप्रमाणे आपल्या पत्रकावर मोदींचे फोटो वापरले ते पाहता त्यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यास ती सगळी पत्रके बदलावी लागणार आहेत. निवडणुक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होणार आहे व तसे न झाल्यास मी कारवाईची मागणी करणार आहे.''

ते म्हणाले, ""मला नारायण राणेमुळे आमदारकी मिळाली नसुन मला इथल्या जनतेने आमदार बनविले आहे आणि सावंतवाडीला पाच वेळा निवडून आलेल्या शिवराम राजेंसारख्या सज्जन लोकांनी इथली आमदारकीची खुर्ची भुषवली आहे. त्यामुळे अशा पवित्र खुर्चीवर डाग लागलेल्या लोकांना बसण्याचा अधिकार नाही. तो अधिकार येत्या निवडणुकीत कोणाला द्यायचा ते लोकांच्या हाती असुन ते योग्य निर्णय घेतील. गेल्या दहा वर्षात मी आंबोली कबूलायतदार प्रश्‍न हाताळत आलो आहे. माझ्या नेमलेल्या त्रिसदस्यीय समिती शासनाने स्विकारली म्हणून हा प्रश्‍न सुटला; मात्र तेली हा प्रश्‍न आपण सोडविल्याचे सांगत आहेत. या संपुर्ण प्रक्रियेशी त्यांचा काय संबंध आहे ? केवळ खोट बोलण हा त्यांचा गुणधर्म आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनताच त्यांना योग्य जागा दाखवेल.''

उद्धव ठाकरेंचे जल्लोषी स्वागत
श्री. केसरकर म्हणाले, ""प्रचारानिमित्त उद्या (ता.16) सावंतवाडीत येणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. गांधी चौक येथे सायंकाळी सात वाजता सभा होणार आहे. तत्पुर्वी सायंकाळी चार वाजता शहरातून मोठी मिरवणुक काढण्यात येणार आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com