
कुडाळः सिंधुदुर्गात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात फक्त तीनच नेते शिल्लक राहिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी माजी आमदार वैभव नाईक हे शिवसेना पक्षात आले तर आमदार निलेश राणे हे ही त्यांचे पक्षात स्वागत करतील, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथील पत्रकार परिषदेत केला. त्यांनी नाईक यांना शिवसेना पक्षात येण्याचे थेट आमंत्रणच दिले. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सभासद नोंदणीसाठी आलो होतो. भाजपचा कोणीही पदाधिकारी, कार्यकर्ता आम्ही आमच्या पक्षात घेतला नाही, तरीही भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या नेत्याशी अगोदर बोलून घ्यावे, असा सल्लाही त्यांनी सावंत यांना दिला.
शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा येथे आभार मेळावा सुरू होण्याअगोदर सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर उपस्थित होते. श्री. सामंत म्हणाले, ‘‘काश्मीर पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा आम्ही शिवसेनेच्यावतीने निषेध करत असून या घटनेमुळे येथे जो आभार मेळावा होता तो अत्यंत साध्या पद्धतीने घेण्यात येणार आहे. श्री. शिंदे यांचेही साध्या पद्धतीने स्वागत करणार आहोत. या मेळाव्यात ठाकरे शिवसेनेचे सुमारे दीड हजारच्यावरती पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. जिल्ह्यातील ठाकरे शिवसेनेतील सर्वच नेते आमच्या पक्षात आले असून तीनच नेते शिल्लक असून तेही बॉर्डरवर आहेत. वैभव नाईक प्रवाहाच्या विरोधात जाऊन बाजूला फेकले जात आहेत. अशा वेळी त्यांनी टीका करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा योग्य तो निर्णय घेऊन शिंदे शिवसेनेत प्रवेश करावा. निलेश राणेही त्यांचे स्वागत करतील.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पक्षाच्या सभासद नोंदणीसाठी आलो आहे. महायुतीतील भाजप तसेच इतर मित्र पक्षांच्या कोणत्याच पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मी पक्षप्रवेश घेतला नाही. तरीही त्यावेळी मी केलेल्या भाषणाचा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत विपर्यास, गैरसमज केला. याबाबत आमचे पदाधिकारी बोलले असते तर वेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या असत्या. याबाबत आता वाद नको. सावंत यांना काही शंका असल्यास त्यांनी मला भेटावे. या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी मी बोललो आहे. पालकमंत्री नितेश राणे हेही माझ्या मतदारसंघात पक्ष संघटना वाढीसाठी येतात ते पक्षाचे काम आहे. यात वाईट वाटून घेण्याचे काहीच नाही.’’
ते म्हणाले, ‘‘कुडाळ एमआयडीसीमध्ये जे ८० लाखाचे काम करण्यात आले ते त्या कामाची मी चौकशी लावणार असून काम चांगले झाले नाही तर परत काम करून घेणार आहे. कुडाळ ही जुनी एमआयडीसी असून पर्यटन जिल्हा झाल्यानंतर येथील निकष बदलले. त्यामुळे आता आडाळी येथे जी एमआयडीसी सुरू केली आहे, त्यावर जास्तीत जास्त भर देण्यात आला आहे. एमआयडीसी येथे जमिनी घेऊन ठेवले आहेत. पण, त्या ठिकाणी अजूनही काहीच सुरू करण्यात आले नाही अशा जमिनी परत घेण्याचे काम सर्वच राज्यातील एमआयडीसींनी सुरू केले आहे.’’
पहलगाम येथे आमचे नेते शिंदे हे घटनास्थळी जाऊन महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांच्या सोबत तिथे कार्यरत आहेत, तर काही जण बसून पत्रकार परिषद घेऊन राजकारण करतात, बडबड करण्याचा त्यांचा पिंड आहे असा टोला त्यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला. काँग्रेस कार्यकारणी सुरू असून जिल्ह्यातही काही नेत्यांचे दौरे सुरू आहेत, असेही ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातील काश्मीर येथे अडकलेल्या पर्यटकांशी मी संपर्क केला आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही दोन पर्यटक मुंबई येथे पोहोचले आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.