रत्नागिरी - वातावरणातील बदलाचा परिणाम मासेमारीवर झालेला असून पर्ससिननेटला वाशी तर डोलनेटला टायनी मिळत आहे; परंतु ती म्हणावी तशी नसल्याने समुद्रात गेलेल्या नौकांना डिझेलचा खर्च भागवता येईल एवढीही परिस्थिती नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
मिरकरवाडा येथील शंभरहून अधिक मच्छीमार रोज मासेमारीला बाहेर पडतात. 15 वावाच्या बाहेर खोल समुद्रात जाऊन पर्ससिननेटद्वारे मासेमारी चालते; परंतु त्यांना पाहिजे तसा बंपर मासा अजूनही मिळत नाही. गेल्या आठ दिवसांमध्ये शंभर नौकांपैकी दहा जणांना 15 ते 20 डिश (एक डिश 32 किलोची) वाशी मासा मिळत आहे. एका डिशला 700 ते 850 रुपये दर मिळत असून समुद्रात जाण्या-येण्याचा खर्चही त्यातून भागवता येत नाही.
60 ते 70 किलो सापडतात हे मासे..
इंधनाबरोबरच खलाशांचा पगार मच्छीमारांच्या अंगावर पडत असल्याने दिवसेंदिवस बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. नवी उमेद घेऊन दर दोन दिवसांनी मच्छीमार समुद्रावर स्वार होत आहेत. पण तुलनेत त्यांना यश मिळालेले नाही. हीच परिस्थिती डोलनेटने मासेमारी करणाऱ्यांचीही आहे. त्यांना ढोमा, टायनी यासारखे मासे 60 ते 70 किलो इतके मिळत आहे. किलोला 75 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. दहा टक्केच मच्छी मिळत असल्याचे सांगितले जात आहे.
मासेमारी करणाऱ्यांची अवस्था गंभीर
क्यार वादळानंतर निर्माण झालेला मासळीचा दुष्काळ अद्यापही सरलेला नसल्याने मच्छीमारी व्यवसायावर संक्रात आली आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असून तीन महिने झाले तरीही मच्छीमारांना म्हणावा तसा फायदा झालेला नाही. पर्ससिननेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांची अवस्था गंभीर असून त्यांच्या हाती अवघा एक महिन्याचा कालावधी राहीलेला आहे. त्यांना मुदत वाढ मिळावी यासाठी केंद्रस्तरावर प्रयत्न सुरु झाले आहेत.
यंदा हलाखीचा हंगाम
वातावरण अद्यापही स्थिर झालेले नाही. त्याचा परिणाम अजूनही असल्याने मासळी म्हणावी तशी मिळत नाही. यंदाचा हंगाम मच्छीमारांसाठी हलाखीचा आहे.
- पुष्कर भुते, मच्छीमार
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.