चिपळूण (रत्नागिरी) : गणेशोत्सवासाठी खासगी ट्रॅव्हल्सने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांकडून तिप्पट दर आकारले जात आहेत. कोरोनामुळे बसमधील मर्यादित प्रवासी संख्या आणि इतर खर्चाचे कारण देत, बसचालकांनी चाकरमान्यांची लूट सुरू केली आहे. सामान्य प्रवासी मात्र या लुटीमुळे भरडला जाणार आहे.
गणेशोत्सवासाठी दरवर्षी लाखो चाकरमानी कोकणात येतात. काही रेल्वे, एसटीने तर काही खासगी वाहनाने येतात. चाकरमान्यांच्या संख्येचा विचार करता दरवर्षी एसटी आणि रेल्वेकडूून जादा फेऱ्या सोडल्या जातात. यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे पाच महिने एसटी, रेल्वे सेवा बंद आहे. गणेशोत्सव काळात ही सेवा सुरू होईल किंवा नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे खासगी वाहनचालकांचे फावले आहे. गणेशोत्सव काळात गावी येणाऱ्या चाकरमान्यांचे त्यांनी आरक्षण सुरू केले आहे.
एका प्रवाशाकडून तब्बल 3 हजार रुपये आकारले जाताहेत. आधी हेच भाडे केवळ 500 ते 700 रुपये होते, पण आता खासगी वाहतूकदारांनी दर वाढविल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. खासगी वाहतूकदार भाडेवाढीचे समर्थन करताना कोरोना आणि टाळेबंदीमुळे आलेल्या आर्थिक संकटाचे कारण पुढे करताहेत. शासनाने खासगी वाहतूकदारांना केवळ 21 प्रवासी घेऊन जाण्याची मुभा दिली आहे. त्यातही प्रवाशांचे परमिट, ई-पास, डिझेलचा खर्च, चालकाचा पगार या सर्व बाबींवरचा खर्च वाढला आहे. मुंबईतून चाकरमानी घेऊन आल्यानंतर जाताना रिकामे जावे लागते. त्यामुळे मोठे नुकसान होते, असे कारण देत खासगी वाहतूकदारांनी भाडे वाढवले आहे.
संपादन - अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.