रायगड (पाली) : अवकाळी पावसाने भात पिकाचे नुकसान तर केलेच. मात्र झोडणी व मळणी नंतर शेतात रचलेला पेंढा देखील भिजला आहे. रविवारी (ता.21) रायगड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पावसात पेंढा भिजल्याने कुजलेला आणि बुरशी आलेला हा पेंढा जनवारांच्या खाण्यायोग्य राहिला नाही. त्यामुळे जनावरांच्या चार्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
काही शेतकर्याने पिकविलेला भात सुरक्षित ठिकाणी ठेवला असला तरी गुरा-ढोरांच्या चार्यासाठीचा पेंढा/पेंढ्याच्या गंजी मात्र शेतातच ठेवल्या होत्या. मुसळधार पावसाने शेतात आणि मांडवावर ठेवलेला सर्व पेंढा भिजला. भिजलेला हा पेंढा आता कूजु लागला असुन त्यावर काळी बुरशी येऊ लागली आहे. त्यामुळे हा कुजलेला पेंढा गुरा-ढोरांच्या खाण्यालायक राहिलेला नाही. रानातील हिरवे गवत देखील आता सुकले आहे. अशा परिस्थितीमध्ये दुभत्या जनावरांचा आणि ढोरांना खायला काहीच राहिले नसल्याने काही दिवसांतच जनावरांवर उपासमारीची वेळ येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गरीब परिस्थितीमुळे पेंढा विकत आणणे देखिल शक्य नाही तसेच सर्वत्रच पाऊस झाल्याने पेंढा उपलब्ध होणे आवश्यक आहे. शिवाय पेंढ्याच्या किंमती देखील वाढू शकतात. त्यामुळे बळीराजा चिंतातुर झाला आहे.
"जनावरांसाठी ठेवलेला पेंढा अवकाळी पावसाने भिजून खराब झाला. आता जनावर्यांचा चार्याची सोय कशी करायची हाच प्रश्न डोळ्यासमोर आहे. ढोर टिकली तरच उदरनिर्वाह चालणार आहे. याबाबत सरकारने काही तरी नुकसान भरपाई दयायला पाहिजे."
- भाऊ कोकरे, शेतकरी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.