
रत्नागिरी : जिल्ह्यात पाटबंधारे विभागाचे ६१ प्रकल्प असून त्यात ४७७ द. ल. घनमीटर पाणी साठा होतो. आतापर्यंत या धरणांवर तीन हजार कोटींचा खर्च झाला असून या पाण्यापैकी अवघे पाच टक्के म्हणजेच २५ द. ल. घनमीटर पाणी सिंचनासाठी वापरले जाते. एकूण क्षेत्राच्या दोन टक्केच क्षेत्र म्हणजे २० हजार हेक्टर जमिनीचा सिंचनासाठी वापर होत आहे, अशी माहिती जल परिषदेच्या निमित्ताने पुढे आली. उर्वरित क्षेत्र सिंचनाखाली आणले तर जिल्हा सुजलाम सुफलाम होऊ शकतो.
जिल्ह्यात सरासरी साडेतीन हजार मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद होते; मात्र ते पाणी वाया जाते. त्याचा उपयोग सिचंनासाठी होणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या सिंचन परिषदेमधून जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांचा म्हणावा तसा उपयोग होत नसल्याची माहिती पुढे आली आहे. पाटबंधारे महामंडळाच्या अभियंता वैशाली नारकर यांनी केलेल्या सिंचनाविषयीच्या सादरीकरणात यावर प्रकाश टाकला.
जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ८ लाख १९ हजार ५५६ हेक्टर असून साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. पाटबंधारे विभागाच्या ६१ प्रकल्पांमध्ये ४२७ दलघनमीटर पाणी साठवले जाते. सध्या सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या कामांमुळे आणखी ११० दलघनमीटर पाणी साठ्यात वाढ होईल. आतापर्यंत धरण प्रकल्पांवर ३ हजार कोटी रुपये खर्च झाले असून १५०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. जलसंपदा विभागाने सिंचनासाठी एवढा मोठा खर्च होत असून त्यामधून पाहिजे तसे सिंचन झालेले नाही. सिंचनक्षेत्रासाठी उपलब्ध ४७७ दलघनमीटरपैकी पाच टक्के म्हणजेच २५ दलघनमीटर पाणी सिंचनासाठी वापरले जाते. पाटबंधारेच्या धरण क्षेत्रातील पाण्याचा वापर करुन २० हजार हेक्टर सिंचनाखाली आले आहे. भविष्यात त्यात १४ हजार हेक्टरची भर पडणार आहे.
का होत नाही सिंचन ?
सिंचनाखाली आणण्यात पाटबंधारे विभागालाही अनेक आव्हाने आहेत. धरणाला असलेल्या कालवे प्रणालीतील त्रुटींमुळे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोचत नाही. अनेक धरणे ही २५ वर्षे जुनी असून ती गाळाने भरली आहे. अनेक धरणांची दुरुस्ती करणे आवश्यक असून शासनाकडून त्याला पैसे उपलब्ध होत नाहीत. जिल्ह्यातील धरणांचे पाणी शेतात पोचवण्यासाठी जलवाहिन्यांचा पर्याय अवलंबण्याची गरज आहे. तसेच गावातील अनेक जमीन मालक नोकरीनिमित्त परजिल्ह्यात आहेत. त्यामुळे धरणक्षेत्राजवळील जमीन पडीक राहते. सध्या शेती आर्थिकदृष्टया परवडत नसल्यामुळेही पाणी असूनही त्याचा उपयोग होत नाही. तर काही ठिकाणी कालवा नेण्यासाठी आवश्यक ते सहकार्य शेतकऱ्यांकडून होत नाही, अशी कारणेही पुढे आली आहेत.
सिंचन निर्मितीसाठी नियोजन
धरण परिसरातील कालवे पुर्नस्थापित करणे आवश्यक असून त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे. तसेच कोकण कृषी विद्यापीठाने लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. कोयना अवजलाचा व्यावसायिकदृष्ट्या वापर करुन त्याद्वारे निधी उभारण्यासाठी प्रयत्न केल्यास कालवे, धरण दुरुस्तीसाठी दरवर्षी निधी मिळू शकतो. नद्यांवर साखळी बंधारे बांधणे, मत्स्योत्पादन घेणे, छोटे-छोटे विद्युत प्रकल्प उभारणे, धरण प्रकल्प क्षेत्रातील मोकळ्या जागेवर बांबू लागवड, जंगली झाडांची लावगडीला प्रोत्सादन देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना मुल्यवर्धित पिके घेण्यासाठी उदयुक्त करण्याची गरज आहे, असे वैशाली नारकर यांनी सांगितले.
एक नजर...
धरणाच्या कालवे प्रणालीत त्रुटी
त्रुटीमुळे पाणी शेतात पोचतच नाही
अनेक धरणे २५ वर्षे जुनी, गाळाने भरली
अनेक धरणांची दुरुस्ती करणे आवश्यक
धरणक्षेत्राजवळील जमीन राहते पडीक
कालवा नेण्यासाठी योग्य ते सहकार्य नाही
एक दृष्टीक्षेप..
जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ८ लाख १९ हजार ५५६ हे.
६१ प्रकल्पांमध्ये ४२७ द.ल.घनमीटर पाणी साठा
प्रकल्प कामांमुळे ११० दलघनमीटरची साठ्यात भर
धरण प्रकल्पांवर झाले ३ हजार कोटी रुपये खर्च
१५०० कोटी रुपयांची अजूनही आवश्यकता
सिंचनक्षेत्रासाठी उपलब्ध साठा ४७७ द.ल.घनमीटर
२५ द.ल.घनमीटर (पाच टक्के) सिंचनासाठी वापर
पाटबंधारे धरणातील पाणी वापराने २० हजार हे. सिंचनाखाली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.